
किरकोळ गुंतवणुकदारांचे सीतारामन यांच्याकडून कौतुक
मुंबई, ता. ७ ः भारतातील सामान्य गुंतवणूकदारांनी गेल्या दोन वर्षांत शेअरबाजार स्थिर ठेवण्यात बजावलेल्या भूमिकेचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज येथे कौतुक केले. शेअर डिपॉझिटरी (डिमॅट स्वरूपातील शेअर साठविणारी) संस्था ‘एनएसडीएल’च्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात शेअरविक्री करत असताना किरकोळ गुंतवणूकदारांनी खरेदी करून बाजाराला मोठ्या पडझडीतून सावरले. भारतीय किरकोळ गुंतवणूकदारांनी शॉक अॅब्सॉर्बर म्हणून आपण काय करू शकतो, हे जगाला दाखवून दिले. वर्ष २०१९-२० मध्ये दर महिन्यात सरासरी चार लाख नवी डिमॅट खाती उघडण्यात आली. २०२०-२१ मध्ये या संख्येत तिपटीने वाढ होऊन ती दर महिन्याला १२ लाख इतकी झाली आणि आता आणखी वाढ दर्शवत २०२१-२२ मध्ये दर महिन्याला सुमारे २६ लाख नवी डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत, याचा उल्लेखही त्यांनी केला.
---
‘मार्केट का एकलव्य’ची सुरुवात
सीतारामन यांनी या वेळी ‘मार्केट का एकलव्य’ या हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषेतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन गुंतवणूकदार जागरुकता कार्यक्रमाची सुरुवात केली. भांडवली बाजारातील मूलभूत गोष्टींचा परिचय करून देणे आणि विद्यार्थ्यांना आर्थिक बाजारपेठेचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
---
‘एनएसडीएल’ची संपूर्ण भारतामध्ये ५७ हजार सेवा केंद्र आहेत. त्यात पावणेतीन कोटींहून अधिक डिमॅट खाती आहेत आणि त्यातील शेअरचे मूल्य चार लाख कोटी डॉलर्सपेक्षा जास्त असून लवकरच ते पाच लाख कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचेल.
- पद्मजा चंद्रू, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ, एनएसडीएल
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81494 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..