
जनता दरबारात समस्यांचा पाढा
वसई, ता. १० (बातमीदार) ः आदिवासी विकास विभागाचे मंत्री के. सी. पडवी यांच्या अध्यक्षेतेखाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जनता दरबारात वसईच्या नागरिकांनी गर्दी केली व समस्यांचा पाढा वाचला. या वेळी जनतेच्या समस्या ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आदेश मंत्र्यांनी दिले.
आदिवासी विकास विभागाचे मंत्री के. सी. पडवी यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा करत ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार भरवला होता. वसईत अल्पसंख्याक समाजासाठी कब्रस्तान, दफनभूमीचा प्रश्न अद्यापही जागेचा तिढा न सुटल्याने प्रलंबित आहे. प्रशासनाला याबाबत अनेकदा विचारणा करण्यात आली असली, तरी मात्र समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच गेल्या तेरा वर्षांपासून ६९ गावांची पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली नाही. त्यामुळे अनेक गावांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. संथ गतीने सुरू असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली; तर पावसाळी कामांच्या उपाययोजना निरी व आयआयटीच्या वसई-विरार महापालिकेला सुचविलेल्या आहेत. यासाठी महापालिकेने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. महामंडळाची बस सेवा पूर्ववत करावी, एमएमआरडीने काशीद कोपर येथे उभारलेल्या पाण्याच्या टाकीची जागा बदलण्यात यावी, यासह अन्य समस्या जनता दरबारात मांडण्यात आल्या.
अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना
आदिवासी विकास विभागाचे के. सी. पडवी यांनी मांडण्यात आलेल्या समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली व लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना केल्या.
पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित, पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक, पालघर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील उपाध्यक्ष सचिन शिंगडा, विविध प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81819 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..