
जनतेचे प्रश्न सोडवण्याला सदैव प्राधान्य
श्रीवर्धन, ता. १० : जनतेने २००९ साली श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदारपदी माझी निवड करून विकासकामे करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली. माझ्या मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी अव्याहतपणे प्रयत्न केलेले आहेत. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याला सदैव प्राधान्य दिले. एके काळी शिरवणे गावात राष्ट्रवादीचा प्रवेश अशक्य होता. त्याच गावांमध्ये आज मी विकासकामाच्या जोरावर राष्ट्रवादी पक्षासह ठामपणे उभा आहे, असे वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केला. श्रीवर्धन तालुक्यातील शिरवणे येथे सुनील तटकरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले. गावातील नळपाणी योजनेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
तटकरे पुढे म्हणाले की, श्रीवर्धन मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम विकासाच्या माध्यमातून आपण करत आहोत. मतदारसंघातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून केलेली विकासकामे पोहोचलेली आहेत. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये श्रीवर्धन मतदारसंघातील जनता राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना भरभरून मते देतील, याचा मला विश्वास आहे, असे तटकरे म्हणाले. नैसर्गिक संकटांचा सामना करत आपत्तीवर विजय मिळवून आपण पुन्हा एकदा श्रीवर्धन मतदारसंघाचे गतवैभव प्राप्त करून दिलेले आहे. दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन शहर या सर्वांच्या पर्यटनपूरक विकासासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. नैसर्गिक संकटात श्रीवर्धन मतदारसंघातील जनतेसाठी ५० कोटींची मदत आपण केली आहे. सागरी महामार्ग, अंतर्गत रस्ते, राज्य महामार्ग सर्वांची कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती तटकरे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, हरिहरेश्वरचे सरपंच अमित खोत, पंचायत समिती सदस्य मंगेश कोबनाक, राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष गणेश पोलेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि शिरवणे व साखरी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81873 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..