
वालधूनी नदी संवर्धन अभियान फास्ट ट्रॅकवर
उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) ः अंबरनाथच्या धर्तीवर उल्हासनगर रेल्वेस्थानकाजवळून वाहणारी वालधुनी नदी संवर्धन अभियान फास्ट ट्रॅकवर राबवण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानात उल्हासनगर पालिका सहभागी झाली आहे. नदीतील गाळ, तुंबलेला कचरा पोकलेन साह्याने बाहेर काढून नदीचा प्रवाह मोकळा केला जात आहे.
अंबरनाथ नगरपालिका प्रशासन आणि वालधुनी नदी संवर्धन समितीचे शशिकांत दायमा, दिलीप मालवणकर, अंजली साळवे, रेखा ठाकूर, शिवाजी रगडे, नारायण वाघ, अनुष्का शर्मा, हरी चावला, कुमार रेड्डीयार, नीतू विश्वकर्मा आदींच्या संयुक्त विद्यमाने वालधुनी संवर्धन स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. अभियानाचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. या अभियानांतर्गत येणाऱ्या वालधुनी नदी पूल, अंबरनाथ एमआयडीसी पाईपलान रोड, कमलधाम वृद्धाश्रम रोड या भागाची उल्हासनगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी पाहणी करून या अभियानात उल्हासनगर पालिका सहभागी होणार असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर पोकलेनच्या साह्याने उल्हासगनर रेल्वेस्थानकासमोरील वालधुनी नदी स्वच्छ करण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी पालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, वालधुनी नदी संवर्धन समितीचे शशिकांत दायमा, सरिता खानचंदानी, शिवाजी रगडे, नारायण वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
केमिकल कंपन्यांमुळे नदी प्रदूषित
सुमारे ३० वर्षांपूर्वी वालधुनी नदीचे पात्र अत्यंत स्वच्छ नितळ होते. या नदीच्या पाण्याचा वापर अंबरनाथ, उल्हासनगरातील नागरिक करत होते. याशिवाय मासेमारीदेखील नदीत करण्यात येत होती. मात्र, एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांचे रसायनमिश्रित पाणी नदीत सोडले जा लागले. त्यामुळे नदी प्रदूषित झाल्याची खंत वालधुनी नदी संवर्धन समितीने व्यक्त केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82016 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..