
रस्ता दुरुस्ती न झाल्यास न्यायालयात जाणार
कल्याण, ता. १२ (बातमीदार) ः कल्याण पश्चिममधील कनकावती बिल्डिंग ते साई विठ्ठल टॉवर या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, याकडे पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता रस्त्याची दुरुस्ती १५ मे पर्यंत न केल्यास पालिकेविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा शिवसेना माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनी दिला आहे.
पावसाळ्यापूर्वी पालिका हद्दीत गटार, नालेसफाई करण्याची कामे करत असताना रस्त्यावर डांबरीकरण करणे, दुरुस्ती करणे आदी कामे केली जातात. मागील दोन वर्षांत कोरोनाच्या नावाखाली अनेक कामांना पालिका प्रशासनाने कात्री लावली आहे. मात्र, शहरातील रस्त्यांची डागडुजी होत असताना कल्याण पश्चिम मधील वार्ड क्रमांक २७ व २८ मधील कनकावती बिल्डिंग ते साई विठ्ठल टॉवर व्हाया कॉलिटी कंपनी या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १३ जुलै २०२१ रोजी निवेदन देण्यात आले होते. मात्र, अधिकाऱ्यांकडून या पत्राची दखल घेतली गेली नाही. उलट अधिकारी उद्धट वर्तन करत असल्याचा आरोप सुधीर बासरे यांनी केला आहे.
वारंवार निवेदन देऊनही रस्त्याचे काम होत नाही. त्यामुळे येत्या १५ मे पर्यंत पालिकेने काम सुरू न केल्यास न्यायालयात दाद मागणार आहे, असा इशारा शिवसेना माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनी दिला आहे.
संबंधित रस्त्याबाबत प्रशासकीय कामकाज सुरू आहे. सर्व मान्यता मिळताच लवकरच काम सुरू करण्यात येईल.
- जगदीश कोरे, कार्यकारी अभियंता, केडीएमसी.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82023 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..