
बदल्यांच्या धोरणामुळे परिचारिका चिंतित
मुंबई, ता. १२ : सर्वसामान्यांना सहज आणि स्वस्त रुग्णसेवा देणाऱ्या शासकीय रुग्णालयांमधील परिचारिका मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून हवालदिल झाल्या आहेत. इडियन नर्सिंग कौन्सिलप्रमाणे रुग्ण-परिचारिका प्रमाण पाळले जात नसताना आता परिचारिका क्षेत्राचे खासगीकरण होण्याच्या भीतीने हजारो परिचारिका चिंतित झाल्या आहेत. राज्य सरकारी रुग्णालयात परिचारिकांचा तुटवडा, त्यांच्या बदल्या आणि खासगीकरण या विरोधात परिचारिकांचा लढा कायम सुरू असून आता त्या पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे जागतिक परिचारिका दिन सप्ताहाच्या निमित्ताने सांगण्यात आले.
इंडियन नर्सिंग कौन्सिलच्या नियमानुसार तीन रुग्णांमागे एक परिचारिका असायला हवी. तसेच अतिदक्षता विभागात एकास एक असे प्रमाण असते; मात्र सध्या अतिदक्षता विभागात १५ रुग्णांमागे एक परिचारिका असे प्रमाण असल्याचे परिचर्या समन्वय संघटनेच्या कार्याध्यक्ष हेमलता गजबे यांनी सांगितले. जे. जे. रुग्णालयात रुग्णसंख्येच्या तुलनेत अडीच हजार परिचारिकांची गरज असताना केवळ ७५० परिचारिका कार्यरत आहेत. सेवानिवृत्ती किंवा नव्या विभागांची सुरुवात केल्यावरही नव्याने पदनिर्मिती केली जात नाही, असे गजबे म्हणाल्या.
---
बदल्यांचे धोरण
शासकीय रुग्णालयांमध्ये बदल्यांचे धोरण परिचारिकांना डोकेदुखी ठरणारे आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी परिचारिका गेल्यास ती त्या क्षमतेने रुग्णसेवा देऊ शकेल का, असा प्रश्न आहे. बदल्यांचे हे धोरण थांबवल्यास कमीत कमी मनुष्यबळातही ताकदीची रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न करता येईल. दर तीन वर्षांनी बदली परिपत्रकाचा मानसिक त्रास आम्हाला सहन करावा लागतो. बदलीसाठी वर्ग तीन आणि वर्ग चारच दिसतो का, असा सवाल गजबे यांनी केला.
---
खासगीकरणाची भीती
रुग्णसेवेचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिचारिकांचे खासगीकरण करणार असून यातून रुग्णसेवाच धोक्यात येऊ शकते. कोविड काळात परिचारिकांना हवे तसे राबवून घेतले; मात्र आमचा कधी कोविडयोद्धा म्हणून सन्मान केला नसल्याची खंत गजबे यांनी यावेळी व्यक्त केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82073 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..