
अधिकाऱ्यांकडून आयुक्तांची दिशाभूल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बुधवारी (ता. ११) नालेसफाईची पाहणी केली होती. त्या वेळी त्यांनी ठाण्यात ४० ते ५० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला. त्याला चोवीस तास होत नाही तोच ठाणे शहर काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे यांनी अनेक ठिकाणांसह के व्हीला येथील नालेसफाईच्या कामाला अजून सुरुवातच झाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. दोन दिवसांपूर्वीच या परिसरातील नालेसफाई कामाची पाहणी आयुक्तांनी केली होती. मग नालेसफाई नक्की कुठे झाली, असा सवाल त्यांनी केला. महापालिका अधिकारी आयुक्तांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पावसाळ्यापूर्वीच संपूर्ण ठाण्यातील नालेसफाई पूर्ण होईल. ४० ते ५० टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्तांनी दिली होती; परंतु अद्यापही ठाण्यातील अनेक ठिकाणी नालेसफाईचे कामच सुरू झाले नसल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केला. जवळपास ५० फूट रुंद असलेल्या व मोठ्या प्रमाणात शहरी भागातील पाणी जात असलेला के व्हीला परिसरातील नालेसफाईला अजून सुरुवातदेखील झाली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पालिका आयुक्तांना अधिकारी नियोजित जागीच घेऊन जातात व सर्वत्र व्यवस्थित काम चालू असल्याचे भासवून आयुक्तांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. आयुक्तही अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून आपला दौरा पार पाडतात. खरी परिस्थिती आयुक्तांसमोर येतच नाही. म्हणून आयुक्तांनीसुद्धा यापुढे कोणत्याही कामाची पाहणी करताना, ज्या भागाचा दौरा करणार असतील, त्या भागातील स्थानिक नागरिकांना पूर्वसूचना द्यावी. या दौऱ्यात स्थानिक नागरिकांना सोबत घ्यावे व त्यांच्या सूचनेनुसार हा दौरा पूर्ण करावा. तेव्हाच खरी वस्तुस्थिती समोर येऊ शकते, असे शिंदे म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82126 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..