
वाडा तालुक्याची मुंबई महानगर प्रदेशात समावेशाची मागणी
वाडा, ता. १३ (बातमीदार) : मुंबई महानगर प्रदेशाची हद्द भिवंडी तालुक्यातील अंबाडीपर्यंत आहे. अंबाडीपासून वाडा तालुका जवळच आहे; पण वाडा मुंबई महानगर प्रदेशात येत नाही. त्यामुळे वाडा तालुक्याचा विकास होण्यासाठी तालुक्याचा समावेश मुंबई महानगर प्रदेशामध्ये करा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील यांनी प्राधिकरणाकडे केली आहे. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल मागवण्यात आला आहे.
वाडा तालुक्याच्या आदिवासी व मागास भागाचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने सन १९९२ ला वाडा तालुका हा ‘डी प्लस झोन’ म्हणून जाहीर केला. यामुळे वाड्यात अनेक उद्योग आले; पण त्यानंतर त्यांना हव्या त्या सोयी-सुविधा सरकारने पुरवल्या नाहीत. रस्त्यांची दुरवस्था, पाणी, विजेची समस्या, वाहतूक समस्या यामुळे उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही उद्योजकांनी वेळेत सुविधा न मिळाल्याने किंवा सवलती बंद झाल्याने कारखाने बंद करून आपला मोर्चा गुजरातकडे वळवला आहे.
वाड्यात अद्याप पडीक जागा मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे गोदामे, कारखाने यांचे जाळे होऊन विस्ताराला वाव आहे. उद्योजकांना सुविधा पुरवल्यास आणखी कारखाने येऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. एमएमआरडीएमुळे रस्ता, पाणी, उड्डाणपूल, मेट्रो आदी कामांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध होऊन वाड्याचा झपाट्याने विकास होईल. तसेच, शेतकऱ्यांनी पिकवलेला माल मेट्रोमुळे थेट मुंबई, ठाणे, कल्याण शहरात विकला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. यासाठी प्राधिकरणामध्ये वाड्याचा समावेश करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील यांनी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82165 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..