
गिरण्यांच्या चाळीत राहणारे घरांसाठी लढा उभाणार
शिवडी, ता. १४ (बातमीदार) ः मुंबईतील गिरण्यांच्या चाळीत राहणाऱ्या रहिवाशांच्या घरांच्या प्रश्नावर सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभा करण्याचा आणि प्रसंगी न्यायालयात जाण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. १३) रहिवाशांच्या बैठकीत घेण्यात आला. परळ पूर्व येथील मजदूर मंझीलमध्ये बोलावण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोविंदराव मोहिते होते.
एनटीसी गिरण्यांच्या चाळीत राहणाऱ्या रहिवाशांना नोटिसा देऊन जागा खाली करून घेण्यात येणार, अशी बातमी माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे गिरण्यांच्या चाळीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मिल मजदूर संघ कार्यालयात चाळ रहिवाशांची सभा बोलावण्यात आली होती.
एनटीसी गिरण्यांच्या चाळीत राहणाऱ्या घरांच्या प्रश्नावर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिन अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या शिष्टमंडळाने काही महिन्यांपूर्वी एनटीसीच्या फोर्ट येथील कार्यालयात मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन या मोडकळीस आलेल्या चाळींचे अपघात होण्यापूर्वी म्हाडाद्वारे पुनर्वसन करण्यात यावे, हा प्रस्ताव मांडला होता. एनटीसी गिरण्यांच्या ३७ चाळींमध्ये सुमारे दोन हजार १०० रहिवासी आहेत. हा प्रश्न केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्यापर्यंत न्यावा, असेही एनटीसी अधिकाऱ्यांना बजावण्यात आले होते; परंतु वस्त्रोद्योग मंत्र्यांकडून या प्रश्नावर अद्याप कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. याबाबत कामगारांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. सचिन अहिर लवकरच रहिवाशांसह वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेणार आहेत.
...
४०५ एफएसआय मंजूर
गिरण्यांच्या चाळींच्या पुनर्वसनासाठी मुंबई महापालिकेकडून ४०५ एफएसआय मंजूर झाला असताना, त्यांना रूम खाली करण्याची नोटीस देता येणार नाही, असे गोविंदराव मोहिते यांनी बैठकीत सांगितले. लवकरच या प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात येईल, असेही मोहिते यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82235 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..