
वाडीबंदर, मुंबई सेंट्रल कार्यशाळेला पसंती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वंदे भारत ट्रेनच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मुंबईची निवड करण्यात आली आहे. अनेक दृष्टीने मुंबईतील कार्यशाळा सक्षम असल्याचा निर्वाळा करत रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वे मार्गावरील वाडीबंदर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल येथील कार्यशाळेला पहिली पसंती दर्शवली. त्यामुळे भविष्यात देशातील महानगर वंदे भारतने जोडण्याचा प्रयत्न रेल्वेचा असल्याचे बोलले जात आहे.
लातूरच्या मराठवाडा रेल कोच फॅक्टरी आणि चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत ट्रेनची निर्मिती केली जाणार आहे. या गाड्यांची वेगमर्यादा ताशी १६० किमी प्रतितास असणार आहे. वंदे भारतचे नवीन डबे मध्यम आणि लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार आहेत. रेल्वे बोर्डाने १३ मे रोजी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेसह सात रेल्वे झोनला पत्र पाठवले आहे. बोर्डाने २०० वंदे भारत ट्रेनच्या निर्मिती-सह-देखभालसाठी निविदा जारी केली आहे. टेक्नॉलॉजी पार्टनर किंवा कॉन्ट्रॅक्टरने ३५ वर्षांपर्यंत या ट्रेनची देखरेख करणे अपेक्षित आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या वाडीबंदर आणि पश्चिम रेल्वेची मुंबई सेंट्रल कार्यशाळा योग्य असल्याचे निदर्शनास आले. मात्र, पश्चिम रेल्वेतील वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडून नाव न लिहिण्याच्या अटीवर मुंबई सेंट्रल ऐवजी जोगेश्वरी साइंडिंग प्रस्तावित डेपोसाठी अधिक असल्याचे सांगितले आहे. वंदे भारत गाड्यांना स्वतंत्र वॉशिंग लाइन असणार आहे. प्रत्येकी १० गाड्यांसाठी किमान दोन वॉशिंग लाइन असतील. सीएसएमटी, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे येथे वॉशिंग लाइन पुरवल्या जाणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82756 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..