-- | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

--
--

--

sakal_logo
By

मुंबईत गुडघाभर पाणी तुंबणार अन् रस्त्यावर खड्डेही पडणार!
आढावा बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण

मुंबई, ता. १९ ः मुंबईत दोन हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते आहेत. अनेक ठिकाणी काँक्रीटच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. गेल्या ८ ते १० वर्षांत झालेल्या नव्या रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत. जुन्या किंवा इतर यंत्रणांच्या रस्त्यावर मात्र काही ठिकाणी खड्डे पडू शकतात. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडणारच नाहीत असा दावा मी करणार नाही, असे स्पष्ट मत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केले. मान्सूनपूर्व बैठकीचा आढावा घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबईतील दरडींवर सुरू असलेल्या उपाययोजनांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. खोटे बोलणार नाही, पण मुंबईत अतिवृष्टी झाल्यास गुडघाभर पाणी साचणारच, असा खुलासाही त्यांनी केला.  

मुंबईतील सर्व यंत्रणांसोबत आदित्य ठाकरे यांनी मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला. खड्डे भरण्यासाठीची कामे, नालेसफाई आणि वृक्षछाटणीच्या कामाचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. ज्या देशात १२ महिने पाऊस पडतो अशा ठिकाणी काँक्रीटचे रस्ते कशा पद्धतीने तयार करतात याचा जागतिक पातळीवरील आढावा आम्ही घेत आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईत दहिसर, ओशिवरा आणि पोयसर नद्यांच्या ठिकाणी काम सुरू आहे. तिथे धोक्याच्या पातळीपेक्षा पाणी जास्त गेल्यास काय उपाययोजना करता येतील हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळेच त्या अनुषंगाने सध्या तयारी सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यंदाच्या उन्हाळ्यात ४५ अंश सेल्सिअसवर तापमान पोहचले आहे. त्यानुसारच मान्सूनमध्येही अतिवृष्टी झाल्यास पूरस्थिती येण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीसारख्या संकटामुळे मुंबईत अनेक ठिकाणी गुडघ्याइतके पाणी भरेलच, असा अंदाजही आदित्य ठाकरे यांनी मांडला आहे. फ्लॅश फ्लडिंग होऊन मुंबईतही पाणी साचू शकते. प्रत्येक ठिकाणी ४८० पंप लावत आहोत. मुंबईतील ९० टक्के पाणी भरणारी ठिकाणे नियंत्रणात आणण्यात आली आहेत. पाणी साचणाऱ्या नवीन ठिकाणी ऑनग्राऊंड जाऊन काम करण्याचेही आम्ही सुचवले आहे, असेही ते म्हणाले.

दरडींखालील रहिवाशांचे स्थलांतर करावेच लागेल
मुंबईत यंदाही बऱ्याच ठिकाणी दरडींचा धोका आहे. गेल्या वर्षी अनेक ठिकाणी संरक्षक भिंती असूनही दरडी कोसळून अपघात झाले होते. काही ठिकाणी झोपडपट्टी वाढल्याने रहिवासी वस्तीत पोहचणे अतिशय आव्हानात्मक असते. म्हाडा, एसआरए यांच्यासोबत चर्चा करून अशा व्यक्तींना कशा पद्धतीने स्थलांतरित करता येईल याबाबत बोलणे सुरू आहे. त्यांना स्थलांतरित करण्याचा दोन-तीन वर्षांचा कार्यक्रम आहे. डीपीसी वा नगर विकास विभागाच्या माध्यमातून आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी दिला आहे. यंदाही ६२ कोटींचा निधी पक्ष न पाहता वितरित केला आहे. आपत्कालीन परिस्थितीचा धोका जास्त आहे अशा ठिकाणी प्राधान्य देण्यात येत आहे. आता काम सुरू झाले आहे. पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याच्या अनुषंगाने आम्ही काम करतो आहोत. त्यामुळे दरडींखालील असलेल्या नागरिकांना स्थलांतर करावेच लागणार आहे. मध्यंतरीच्या काळात पीएपीसाठी ३० हजार घरे तयार करण्यात येणार आहेत. ती तयार झाल्यावर त्यांचे स्थलांतर करू, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

एनडीआरएफ-एसडीआरएफची मदत घेणार
यंदाचा हिवाळा आणि उन्हाळा अपेक्षेपेक्षा जास्त तीव्र राहिला आहे. त्यामुळेच पावसाळाही अशाच पद्धतीने असेल, असा अंदाज आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. मान्सूनचा कालावधी यंदाही जोरदार आणि आव्हानात्मक असू शकतो. आमची त्यासाठी तयारी सुरू आहे. नुकसानीचे प्रमाण कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेसोबतच आम्ही एनडीआरएफ आणि एसडीआरएफची मदत घेणार आहोत. अतिवृष्टी झाल्यास किंवा ढगफुटी झाल्यास मुंबईसारखी यंत्रणा कुठेही नाही, असा दावाही त्यांनी केला. पाऊस आला तर रिस्पॉन्स टाईम कमी असावा यासाठी आपण तयार आहोत, असेही ते म्हणाले.