
पाच सिमेंट काँक्रिट बंधाऱ्यांना मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : ठाणे तालुक्यातील ५ नवीन सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांचे व येऊर येथील हुमायून बंधारा दुरुस्ती करण्याचे काम मृद् व जलसंधारण विभागाने मंजूर केले आहे. येऊर येथे जुन्या हुमायून बंधाऱ्याची दुरुस्ती करून आणखी नवीन ५ बंधारे बांधले जाणार आहेत. या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठीचा प्रस्ताव उपवनसंरक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. शहरी भागात अशा प्रकारे जलसंधारण करण्यासाठी बंधारे बांधण्याचा हा पहिला प्रयोग आहे. येऊर येथे बांधल्या जाणाऱ्या बंधाऱ्यातून ठाण्याला ३ एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
येऊर येथे धबधबा असून पावसात हे सर्व पाणी वाहून जाते. वाया जाणारे पाणी वापरात यावे, यासाठी बंधारे बांधण्याची मागणी आमदार सरनाईक यांनी केली होती. गेल्या वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार सरनाईक यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले होते. त्या वेळी मंत्र्यांनी याबाबत जलसंधारण विभागाला सर्वे करण्याचे आदेश दिले होते. तसेच, याबाबत फेब्रुवारी महिन्यात मंत्री गडाख यांच्यासोबत आमदार सरनाईक व संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही पार पडली होती. त्यानंतर या कामाचा सर्वे करून प्रत्यक्षात कामाचा प्रस्ताव, कामांचे अंदाजपत्रक बनवण्याचे काम सुरू करण्यात आले होते.
येऊर येथे स्थानिक नाल्यावर नवीन ५ सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांचे बांधकाम केले जाणार आहे. हुमायून बंधारा साधारण ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. आता तो खराब झाला आहे. त्या हुमायून बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठीचे अंदाजपत्रकही बनवण्यात आले आहे. ५ नवीन बंधारे व हुमायून बंधारा दुरुस्तीसाठीचे अंदाजपत्रक बनवून या कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. ठाणे जिल्हा जलसंधारण अधिकारी प्र. व. खेडकर यांनी या कामांना मान्यता देऊन या कामांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी हा प्रस्ताव संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वनपरिक्षेत्र यांच्या उप-वनसंरक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. आता वन विभागाने मान्यता दिल्यानंतर हे काम सुरू होणार आहे.
…...........................
३ एमएलडी पाणी उपलब्ध होणार!
येऊर येथे बंधारे बांधकाम केल्याने साधारण ३ एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. हे बंधारे बांधण्यासाठी सुमारे ९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हे काम याच वर्षात प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील. हे बंधारे झाल्यामुळे वन्यप्राण्यांनाही जंगलातच पाणी वर्षभर मिळणार आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशा प्रकारे जलसंधारणाची कामे अनेक ठिकाणी झाली आहेत. मात्र शहरी भागात पहिल्यांदा पाणी अडवून त्याचा सदुपयोग व्हावा म्हणून बंधारे बांधकाम करण्याचे काम होणार असल्याचे आमदार सरनाईक यांनी सांगितले.