
उद्धट दुकानदारही मोदींपेक्षा बरा
मुंबई, ता. २३ : आधी पेट्रोलचे भाव भरमसाट वाढवून नंतर त्यात थोडीशी सूट देणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारपेक्षा उद्धट दुकानदार परवडला. तो निदान एकच भाव कायम ठेवतो, अशी गमतीदार टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
केंद्र सरकारने नुकतीच करात सवलत देऊन इंधन दरवाढीमुळे होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ही केंद्र सरकारची चलाखी आहे. लोकांकडून पैसे उकळणारा एखादा लबाड व्यापारी जसे आपल्या वस्तूंचे भाव आधीच शंभर रुपयांनी वाढवून ठेवतो आणि मग घासाघीस घालून मोठे उपकार करून पन्नास रुपये सवलत दिल्याचे दाखवतो. तसाच हा प्रकार असल्याची टीका बरगे यांनी केली आहे. त्यापेक्षा ग्राहकाने दरात सूट मागितल्यावर, ‘एकच भाव'' असे वसकन अंगावर ओरडणारा दुकानदार परवडला. तो निदान एकच भाव कायम ठेवतो आणि अशी चलाखी करत नाही, असेही ते म्हणाले.
देशवासीयांनी विश्वासाने भाजपला देश चालवण्यासाठी दिला होता, दुकान चालवण्यासाठी दिले नव्हते, याची जाणीव मोदी यांनी ठेवावी. दुकानदार आणि ग्राहक जसे रास्त किमतीसाठी घासाघीस घालतात तसा प्रकार केंद्र सरकारने करू नये. ही लोकांची धडधडीत फसवणूक आहे. केंद्र सरकारनेही इंधनाचा एकच रास्त भाव निश्चित करावा, असाही सल्ला बरगे यांनी दिला आहे.
...
दिलासा सहज शक्य
सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार इंधनाचे दर बदलत असले तरीही ते दर कमी ठेवून जनतेला दिलासा देणे केंद्र सरकारला सहज शक्य आहे. केंद्र सरकारच्या हातात प्रचंड अधिकार आहेत. रोज थोडी थोडी इंधन वाढ करून जनतेला रोज फटके द्यायचे आणि एखाद्या दिवशी कर कमी करून जनतेला दिलासा दिल्यासारखे दाखवायचे हे धोरण योग्य नाही. महसूल वाढवण्यासाठी जनतेवर भार टाकू नये, असेही बरगे यांनी म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83189 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..