
टी जंक्शन ते कोपरी उड्डाणपूल प्रकल्प रद्द करावा
कोपरखैरणे, ता. २३ (बातमीदार) : सध्या रस्त्यांवर असणाऱ्या वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. जनतेचे कोट्यवधी रुपये वाया घालवून आणि शेकडो झाडे तोडून उड्डाणपूल बांधण्याचा पर्याय प्रशासन स्वीकारणार असेल, तर ते आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून चुकीचे आहे, असे म्हणत आम आदमी पार्टीने टी जंक्शन ते कोपरी उड्डाणपूल रद्द करावा, अशी मागणी केली आहे.
पालिकेची एकीकडे माझी वसुंधरा म्हणून पोस्टरबाजी आणि दुसरीकडे मोठ्या वृक्षांची कत्तल करण्याची तयारी सुरू आहे. एकविसाव्या शतकातील शहर असलेल्या नवी मुंबईत नवी मुंबई महापालिका राबवीत असलेले काही जनताभिमुख प्रकल्प नवी मुंबईकरांसाठी अभिमानास्पद असले, तरी काही प्रकल्प नक्कीच खटकण्यासारखे आहेत. त्यातील पाम बीच मार्गावरील महात्मा फुले टी जंक्शन ते कोपरी उड्डाणपूल हा प्रकल्प आहे. नवी मुंबईतील वाढती वाहतूक व्यवस्था अधिकाधिक सुखकर आणि गतिमान व्हावी, या दृष्टिकोनातून कोट्यवधी रुपये खर्चून पामबीच मार्गाची निर्मिती करण्यात आली; पण काही वर्षातच हा मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. पामबीच मार्ग हा नो पार्किंग झोनमध्ये येतो; पण प्रत्यक्षात हाच महामार्ग भंगार व्यावसायिकांना आंदण दिल्यासारखा आहे, असे ‘आप’चे प्रवक्ते प्रमोद महाजन यांनी म्हटले आहे.
तिन्ही मार्गिका खुल्या कराव्यात
पाम बीच मार्गावरील सर्व अवैध अडथळे दूर करून तिन्ही मार्गिका खुल्या केल्यास वाहतूक नक्कीच गतिमान आणि सुखकर होऊ शकते. त्यानंतर ३५३ कोटी वाया घालवून पुलाची गरजच उरणार नाही, असे महाजन म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83222 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..