
जांभळाचा हंगाम लांबला!
मनोर, ता. ३१ (बातमीदार) ः हंगाम लांबल्याने जांभूळ उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरवर्षी साधारणपणे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जांभळाच्या झाडांवर फळे तयार होऊन काढली केली जाते; परंतु यंदा पावसाळा सुरू होण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी शिल्लक असताना बहाडोली गावातील दहा ते वीस टक्के झाडांवरील जांभळाच्या फळांची काढणी होत आहे. गेल्या वर्षी मान्सून लांबल्याने जांभळाच्या झाडांना उशिरा मोहोर आला होता. त्यामुळे यंदाचा फळ काढणीचा हंगाम लांबला असून पावसाळा सुरू होईपर्यंत शेतकऱ्यांना वीस टक्के जांभूळ फळे काढता येणार असल्याचे जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
पालघर तालुक्यातील वैतरणा खाडीच्या पूर्वेला वसलेले बहाडोली गाव टपोऱ्या जांभळासाठी प्रसिद्ध आहे. बहाडोली गावच्या ११० हेक्टर क्षेत्रापैकी ६० हेक्टर क्षेत्रात सहा हजार जांभळाच्या झाडांची लागवड आहे. एका झाडापासून पाचशे ते आठशे किलो जांभळाच्या फळांचे उत्पादन मिळते. सुरुवातीला हजार ते बाराशे रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने जांभळाच्या एका झाडा मागे शेतकऱ्यांना पन्नास हजारांपासून ऐंशी हजारांच्या घरात उत्पन्न मिळते. त्यामुळे बहाडोली-खामलोली भागातील पारंपरिक भात शेती करणारे अनेक शेतकरी जांभूळ शेती कडे वळले आहेत.
बहाडोलीच्या जांभळाच्या तयार फळांच्या काढणीचा हंगाम एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या पासून सुरू होतो. एप्रिल महिन्यामध्ये बाजारात दाखल होणारी जांभळे मे महिन्याचा तिसरा आठवडा पूर्ण होवूनही बाजारात उपलब्ध झालेली नाहीत. मोहोर उशिरा आल्याने फळे तयार होण्याची उशिर झाला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होइपर्यंत एकूण उत्पादनाच्या वीस टक्के जांभळे शेतकऱ्यांच्या हाती लागणार आहेत. चांगले उत्पन्न मिळत असल्याने जांभळाच्या झाडांची निगा राखण्यासाठी मोठा खर्च बहाडोलीचे शेतकरी करीत असतात; परंतु यंदा हंगाम लांबल्याने शेतकऱ्यांचा खर्च निघणे कठीण होणार असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
मोहोर उशिरा आल्याने फळे तयार होण्यासाठी उशिरा झाला आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जांभळाच्या फळे काढणीसाठी तयार होण्याचे प्रमाण कमी आहे. मान्सूनच्या आगमनाला दोन आठवड्यांचा अवधी शिल्लक आहे. अशात फळे तयार होण्यास एक ते दोन आठवडे लागणार असल्याने पावसाळ्यात तयार होणाऱ्या जांभूळ फळांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
- तरुण वैती, तालुका कृषी अधिकारी
लांबलेल्या मान्सूनमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडला होता. पावसात जांभळाच्या झाडाला आलेला मोहोर गळून पडला होता. त्यानंतर पुन्हा तुरळक प्रमाणात मोहोर येऊन झाडांना तुरळक प्रमाणात फळे लागली आहेत. त्यातच फळगळीचे प्रमाण अधिक आहे. अजूनही फळे तयार झालेली नाहीत. जून महिन्यात पावसामुळे फळे वाया जाऊन आमचे मोठे नुकसान होणार आहे.
- अनिल पाटील, शेतकरी, बहाडोली
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83244 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..