
शासनाच्या निधी असूनही विकासकामे का नाही?
उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) ः खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी येऊन अनेक महिने उलटून गेल्यावरही ही कामे मार्गी का लागली नाहीत, असा प्रश्न आज शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पालिकेचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांना विचारला. तेव्हा ३० मेपूर्वी निविदा प्रक्रिया हाताळून विकासकामांना गती दिली जाईल, असे आश्वासन दयानिधी यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
शहरात सुरू असलेल्या आणि खोळंबलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक धनंजय बोडारे, राजेंद्रसिंह भुल्लर, कलवंतसिंह सोहता, सुरेश जाधव, अंकुश म्हस्के, ज्योती माने, उपशहरप्रमुख परशुराम पाटील, राजेंद्र शाहू, दिलीप गायकवाड, कैलास तेजी आदींनी दयानिधी यांची भेट घेतली. तेव्हा पालिकेकडे निधी नसल्याचे आयुकांनी सांगितले; पण शासनाकडून आलेल्या निधीचे काय झाले, असा प्रश्न गोपाळ लांडगे यांनी विचारला. यासोबतच कॅम्प नंबर ४ व ५ मध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून ही यंत्रणा सुरळीत करून पिण्याच्या पाण्याची वेळ वाढवून द्यावी, डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न निकाली काढावा, पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई युद्धपातळीवर हाती घ्यावी, सिमेंट काँक्रीटच्या ४ रोडच्या कामास तत्काळ सुरुवात करण्यात यावी, रस्त्यावरील खड्डे भरण्यात यावेत, रोडवरील भंगार साहित्य व वाहने उचलावीत, याकडेही शिष्टमंडळाने आयुक्तांचे लक्ष वेधले. या वेळी सिंधी सेनेचे रवी खिलनानी, उपविभागप्रमुख आदिनाथ कोरडे, अनिल मराठे, अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रविण चकोले, नगरचनाकार प्रकाश मुळे, पाणीपुरवठा अभियंता किशोर रहेजा, एमएमआरडीए कार्यकारी अभियंता जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83441 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..