
रेल्वेच्या धडकेत दोघांचा बळी
ठाणे/ दिवा, ता. १ ः दिवा रेल्वे स्थानकाच्या फाटकात लोकलच्या धडकेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. मृतांमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातातील मृत आणि जखमी व्यक्ती दिवा पूर्व परिसरातील रहिवासी असून सकाळी कार्यालयात जाण्यासाठी ते निघाले होते.
दिवा रेल्वे स्थानकाच्या फाटकातून खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या खोपोली जलद गाडीने रूळ ओलांडणाऱ्या दीपक सावंत (२६), गीता शिंदे (३५) आणि महादेवी जाधव यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दीपक सावंत आणि गीता शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला असून महादेवी जाधव ही महिला गंभीर जखमी झाली. महादेवी जाधव या महिलेला दिव्यातील बालाजी हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचार करून दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले; तर मृतांना ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. रेल्वे पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दिवा शहरातील ९० टक्क्यांहून अधिक लोक पूर्वेला राहत असून रेल्वेचे एकमेव तिकीट घर मात्र पश्चिमेला आहे. त्यामुळे बहुतेक प्रवासी तिकीट काढण्यासाठी सर्रास रेल्वे रूळ ओलांडताना दिसतात. मुंबईच्या दिशेने दिवा पूर्वला उतरणारा जिना रुंद करावा, तसेच तिथे सरकरता जिना बसवावा अशी मागणी दिव्यातील प्रवासी संघटनेतर्फे सातत्याने करण्यात येत आहे; मात्र अद्याप तेथे तशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत, असा आरोप प्रवाशी करत आहेत.
...तर प्रवाशांचा उद्रेक होईल़!
दिवा स्थानकात जर रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पर्याप्त व्यवस्था केली नाही, तर भविष्यात प्रवाशांचा उद्रेक होईल, याची दक्षता रेल्वे प्रशासनाने घ्यायला हवी, असा इशारा दिवा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांनी दिला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84391 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..