
कसारा घाटात दरडीची टांगती तलवार
नरेश जाधव/ सकाळ वृत्तसेवा
खर्डी, ता. ८ ः कसारा घाटाच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम करताना ठेकेदाराने अनेक ठिकाणी डोंगर फोडून नवीन रस्ता तयार केला आहे, परंतु दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी गेल्या १० वर्षांपासून कोणतीही प्रतिबंधक उपाययोजना केली गेली नाही. त्यामुळे कसारा घाटात दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरून रोज हजारो वाहनचालक व प्रवासी जीव मुठीत घेऊन घाटातून प्रवास करीत आहेत. घाटात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळतात. ही गोष्ट माहीत असूनही संबंधित ठेकेदार कंपनी व प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडून योग्य ती उपाययोजना करून दरडीच्या अपघातात नाहक जाणारे बळी वाचवावेत, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटाचे २००२ मध्ये चौपदरीकरण करण्यात आले होते. हे काम करताना मोठमोठे डोंगर फोडण्यात आले; मात्र डोंगर फोडल्यानंतर अर्धवट राहिलेल्या डोंगरांना संरक्षक जाळ्या लावल्या नाहीत. त्यामुळे येथे दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळत असतात. ब्लास्टिंग करून ठेवलेल्या ठिकाणी तडे गेल्याने ते कधी खाली येतील याची शाश्वती नाही. पावसाचे पाणी तोडलेल्या डोंगरात शिरत असल्याने त्यातील माती निघून जाते. त्याचा एकसंधपणा संपतो. त्यामुळे दरडी कोसळतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकारही घडत आहेत.
नागमोडी वळणे व तीव्र उतारामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे; तर बिबलवाडी व चिंतामणवाडी येथे डोंगरमाथ्यावरून येणाऱ्या पाण्याला जायला वाट नसल्याने पाणी महामार्गाच्या रस्त्यावरून वाहते. त्यामुळे पावसाळ्यात येथे अपघात होत असतात. याबाबत दिल्लीतील रोड रिसर्च सेंटरने आठ वर्षांपूर्वी संपूर्ण दरड परिसरात रोलिंग प्रेसच्या जाळ्या बसवण्यात याव्यात असा अहवाल केंद्र व राज्य सरकारकडे सादर केला होता, परंतु त्या अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आले.
----
वर्षभरात १५ जणांचा मृत्यू
गेल्या वर्षी सातआठ ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तसेच १२ ते १५ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पाच वर्षांपूर्वी बसवर दरड कोसळल्याने नाशिक रेल्वे मार्गावर चार जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी नवीन घाटावर दरडी कोसळल्याने रस्ता खचला. त्यामुळे मुंबईकडे जाणारा रस्ता दोन दिवस बंद करावा लागला होता. त्यामुळे नव्या घाटाच्या ठिकाणी लवकरात लवकर उपाययोजना करून नाहक जाणारे बळी वाचवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
---
जुन्या कसारा घाटात अनेक ठिकाणी पावसाळ्यात दरडी कोसळत असतात. त्यामुळे येथून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. घाटातील धोकादायक ठिकाणी संबंधित विभागाने संरक्षक जाळी किंवा अन्य उपाययोजना कराव्यात, जेणेकरून नाहक कोणाचे बळी जाणार नाहीत.
- उमेश कस्तुरे, प्रवासी.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85098 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..