
शेतकऱ्यांना भातविक्रीवरील बोनस द्या
भिवंडी, ता. १२ (बातमीदार) : भिवंडी, ठाणे व पालघर जिल्ह्यातील २५ हजार शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाला विक्री केलेल्या भातावर प्रतिक्विंटल बोनस देण्याची घोषणा करावी, अशी विनंती केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.
भिवंडी, ठाणे व पालघर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे भात हे नगदी पीक आहे. आदिवासी विकास महामंडळाला शेतकऱ्यांकडून भाताची विक्री केली जाते. विक्री केलेल्या भाताच्या वजनानुसार शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून बोनस दिला जातो. गेल्या वर्षी ७०० रुपये बोनस दिला गेला होता. त्यात केंद्र सरकारकडून २०० व राज्य सरकारकडून ५०० रुपये दिले गेले होते. आता पेरणीसाठी काही दिवस उरले असताना, बोनस न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. २०२१-२२ या वर्षात ठाणे जिल्ह्यातील १३ हजार ३६० व पालघर जिल्ह्यातील ११ हजार ७४७ शेतकऱ्यांनी ८ लाख ३८ हजार ७४४ क्विंटल भाताची विक्री केली. त्यापोटी शेतकऱ्यांना सुमारे १६२ कोटी ७२ लाख रुपये मिळाले आहेत. या रकमेवरील प्रोत्साहन बोनसची शेतकऱ्यांकडून वाट पाहिली जात आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रोत्साहन बोनसची रक्कम लवकरात लवकर प्रदान करावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85481 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..