
माहुलवासीयांसाठीच्या कुर्ल्यातील घरांची दुरावस्था
मुंबई, ता. १५ : ओबडधोबड जमीन... सर्वत्र कचऱ्याचे ढीग... त्यात काळवंडलेला इमारतींचा सांगाडा... घरांना ना खिडक्या, ना दरवाजे... रंगरंगोटी तर दूरच... ही अवस्था आहे माहुलवासीयांच्या कुर्ला येथील घरांची... सरकारने माहुल येथील १६०० कुटुंबांना कुर्ला येथे घरांचे वाटप केले; मात्र प्रत्यक्षात तिथे जाऊन पाहिल्यावर सरकारने माहुलवासीयांच्या तोंडाला पाने पुसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
माहुल परिसरातील वाढत्या प्रदूषणामुळे माहुल येथील अनेकांचा कर्करोगासह इतर गंभीर आजारांनी जीव गेला. त्याविरोधात अनेक वर्षे आवाज उठवल्यानंतर जागे झालेल्या सरकारने माहुलवासीयांचे मुंबईतील रिकाम्या घरांमध्ये स्थलांतर सुरू केले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सहा महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत माहुल येथील १६०० कुटुंबीयांना कुर्ला पश्चिम येथील एमएमआरडीएची तयार घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र या इमारतींच्या भोवताली सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य आहे.
इमारतीतील घरांना ना दरवाजे आहेत, ना खिडक्या. वीज, पाणी तर दूरची गोष्ट. ही रिकामी पडलेली घरे गर्दुल्यांचे अड्डे झाले आहेत. त्यामुळे अनेक घरांमध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. ही घरे पाहताच माहुलवासीयांचा भ्रमनिरास झाला. अशा घरांमध्ये कसे राहायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. ‘घर बचाओ, घर बनाओ’ आंदोलन समितीसोबत झालेल्या बैठकीत या घरांची डागडुजी करण्याचे निर्देश सरकारने एमएमआरडीए प्रशासनाला दिले होते; मात्र सहा महिने झाले तरी एमएमआरडीएने अद्याप घरांची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे माहुलवासीयांना प्रदूषणयुक्त वातावरणात दिवस काढावे लागत आहेत.
गोराई येथे २८८ कुटुंबांचे स्थलांतर
वाढत्या प्रदूषणामुळे माहुल येथील रहिवाशांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सुरू झाले आहे. ६ मार्च २०२० रोजी पहिल्या टप्प्यात गोराई येथे स्थलांतर करण्यात आले. गोराई येथे आतापार्यंत २८८ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे.
कुर्ला येथील घरे देण्याचा निर्णय डिसेंबर २०२१ मध्ये झाला. दोनतीन महिन्यांत घरे मिळतील, अशी अपेक्षा होती; मात्र सहा महिने उलटले तरी घरे मिळाली नाहीत. माहुलवासीयांची सरकारने फसवणूक केली आहे.
- रेखा घाडगे, ‘घर बचाओ, घर बनाओ’ आंदोलन
कुर्ला येथील घरांच्या डागडुजीसाठी ७० ते ७५ कोटींचा खर्च करण्यास सरकारने एमएमआरडीए प्रशासनास सांगितले आहे. एमएमआरडीए आणि पालिका प्रशासनाशी अनेकवेळा बैठका झाल्या, पण केवळ टोलवाटोलवी सुरू आहे. सरकारच्या उदासीनतेमुळे माहुलवासीयांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे.
- गजानन तांदळे, आंदोलक
कुर्ला येथील घरे मिळणार म्हणून आम्ही मुलांचे प्रवेश तेथील शाळेत घेतले; मात्र घरांचा ताबा अद्याप मिळलेला नाही. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आहे.
- सविता शिंदे, माहुलवासीय
आवश्यक खर्चासाठी एमएमआरडीए प्रशासनाची मंजुरी मिळाली आहे. पुढील सहासात महिन्यांत दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल.
-सुचिता भिकाने, उपजिल्हाधिकारी, एमएमआरडीए
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85849 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..