
देशमुख होम्सचे पाणी बड्या गृहसंकुलांना
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : डोंबिवलीतील देशमुख होम्स संकुलातील रहिवासी गेल्या कित्येक महिन्यांपासून पाण्याच्या समस्येने हैराण आहेत. पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही पाणी येत नाही. केडीएमसी प्रशासन व एमआयडीसी एकमेकांकडे बोट दाखवित जबाबदारी ढकलत आहेत. देशमुख होम्सचे पाणी अनंतम, रिजन्सी या बड्या गृहसंकुलांना बुस्टर पंप लावून वळविण्यात आले आहे. अद्याप त्यावर कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर येथील स्थानिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या वंदना सोनावणे यांनी पाणी प्रश्नावर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
डोंबिवली पूर्वेतील टाटा पावर परिसरात देशमुख होम्स संकुल आहे. या संकुलात १३५० सदनिका धारक राहतात. २७ गावांसह या भागातदेखील गेल्या कित्येक महिन्यांपासून पाणी समस्या ही जटील आहे. कल्याण, डोंबिवली महापालिकेने वेळोवेळी पाण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची योजना दिली. त्यानुसार २०१६ पासून स्वखर्चाने पाणी लाईन घेण्यापासून ते टॅपिंग व्यास वाढविणे, झोनिंग करण्यापर्यंत लाखो रुपये खर्चून योजना केल्या. उपाययोजना केल्यानंतर सुरुवातीला ८ ते १० दिवस ८०० ते ९०० युनिटपर्यंत पाणी दाखवून नंतर ते पुन्हा २०० ते ३०० युनिटवर आणले. याविषयी स्थानिकांनी लोकप्रतिनिधी, एमआयडीसी, पालिका अधिकारी साऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र प्रश्न सुटला नाही. पाणी प्रश्नावरून स्थानिक नागरिकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालिका प्रशासन, एमआयडीसी अधिकारी या सर्वांची भेट घेतली. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही याप्रश्नी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
पाणी कपात नाहीच
पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी सर्वस्वी कल्याण-डोंबिवली महापालिकेची असून एमआयडीसीने कोणतीही पाणी कपात केलेली नाही, उलट पाणीपुरवठ्यात वाढ केली असल्याचे सांगितले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85929 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..