
पालघर पालकमंत्री पदासाठी रस्सी खेच
वसई, ता. ४ (बातमीदार) : राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण अशा चर्चेला उधाण आले आहे. याआगोदर शिवसेनेचे दादा भुसे हे पालकमंत्री होते, परंतु त्यांनाच कायम ठेवणार, की बहुजन विकास आघाडीने तीन मते भाजपला दिल्याने बविआला बक्षिसी दिली जाणार अशा चर्चा जिल्ह्यात होत आहेत. राज्यात सत्तानाट्य झाले व त्यानंतर नवे सरकार स्थापन झाले. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे शिंदे गटातील आहेत; तर भूसेनेनेदेखील सेनेला रामराम केला आहे. पालघर जिल्हा मोठा आहे, जिल्ह्यात आदिवासीबहुल क्षेत्र असून दुर्गम भाग अधिक आहे. पालकमंत्री दादा भुसे असताना त्यांनी जिल्ह्याचे दौरे, विकास, शेतकरी समस्या याचा पाठपुरावा केला असला, तरी अनेक ठिकाणी त्यांच्याबद्दल नाराजीदेखील होती. जिल्ह्यातील नसल्याने संपर्क कमी होत होता. त्यामुळे या वेळी जिल्ह्यातील पालकमंत्री असावा अशी चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटात गेलेले आमदार श्रीनिवास वगना यांना पालकमंत्रिपद मिळू शकते; मात्र गेल्या निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट नाकारले होते व सेनेतून ते निवडून आले होते. वनगा हे शिंदे यांच्या जवळचे असल्याने मंत्रिमंडळात त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो; तर बहुजन विकास आघाडीच्या तीनही आमदारांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. जर तसे झाले तर आमदार क्षितिज ठाकूर यांच्यावर भाजप पालकमंत्री पदाची जबाबदारी पाठिंब्याची बक्षिसी म्हणून देऊ शकते. जिल्ह्यात अनेक मोठे प्रकल्प राबवले जात आहेत. ज्यात बुलेट ट्रेन, अलिबाग कॉरिडॉर, मालवाहतूक सेवा यासह अन्य प्रकल्प आहेत, तसेच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, नागरिकांशी नेहमी संपर्कात राहून समस्यांची उकल करणारा पालकमंत्री असावा, यासाठी सरकार नियोजन आखू शकते, जेणेकरून भविष्यात येथील सत्ता काबीज करण्यात अडचणी येणार नाहीत, असा दृष्टिकोन असू शकतो; मात्र यात दादा भुसे यांचीच पुन्हा वर्णी लागली तर येथील नागरिकांतून कोणत्या प्रतिक्रिया येतील हे निवडीनंतर स्पष्ट होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87779 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..