
नवीन पुणे-नवीन औरंगाबाद हायवेलगत उभारावे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : ताशी १३० किमी वेगाने बंगळूरुपर्यंत जाण्यासाठी मुंबई पुणे बंगलोर हायवे बांधण्याचा प्रस्ताव आहे; तर पुणे ते औरंगाबाद दोन तासांत जाण्यासाठी हायवे बांधायचा आहे. त्यासाठी सरकारने भूसंपादन करून त्यांच्याशेजारीच नवी मुंबईप्रमाणे नवीन पुणे आणि नवीन औरंगाबाद तयार करावे, असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिला.
‘आजादी का अमृतमहोत्सव - संकल्प सिद्धी’ या सीआयआयतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या दोन महामार्गांसाठी राज्य सरकारने भूसंपादन करावे आणि नवी मुंबईप्रमाणेच या दोन महामार्गांशेजारी टाऊनशिप तयार कराव्यात, असेही त्यांनी सुचवले. या हायवेमुळे पुणे ते बंगलोर साडेतीन तासांत; तर मुंबई ते बंगलोर साडेचार तासांत जाता येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
नरिमन पॉईंटवरून दिल्लीपर्यंत बारा तासांमध्ये जाण्यासाठी हायवे बनविण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पन्नास हजार कोटी रुपयांच्या मोठ्या पुलाचा आराखडा तयार आहे. त्याच्या स्टील व सिमेंटवरील जीएसटी महाराष्ट्राने माफ करावा व सिमेंट रॉयल्टी फ्री करावे; तर हे पैसे मी उभे करेन. या हायवेमुळे महाराष्ट्राचा विकास होईल, असेही गडकरी यांनी या वेळी नमूद केले. पाच लाख कोटी अमेरिकी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट मुंबई-महाराष्ट्राच्या सहभागाखेरीज पूर्ण होणार नाही, असेही ते म्हणाले.
..................................
इथेनॉलची कॅलरी व्हॅल्यू वाढली
इथेनॉलची कॅलरी व्हॅल्यू आता वाढली असल्याने ती वापरणाऱ्या गाड्यांना पेट्रोलइतकेच अॅव्हरेज मिळेल. इथेनॉलची किंमत ६४ रुपये असल्याने आता फ्लेक्स गाड्यांमध्ये त्यांचाच वापर करावा. सार्वजनिक वाहतुकीच्या गाड्याही विजेवर चालविल्यास त्यांचे तिकीट ३० टक्के कमी होईल, असेही गडकरी म्हणाले.
जुन्या सरकारांवर टीका
गेल्या आठ वर्षांत देशात बरेच परिवर्तन झाले, त्यापूर्वी काय झाले याची चर्चा मी करणार नाही, असे सांगताना गडकरी यांनी त्यापूर्वीच्या सरकारवर टीका केली. चुकीची आर्थिक धोरणे, वाईट व भ्रष्ट प्रशासन ही आपली समस्या होती. त्यामुळे गरीब लोकांचे श्रीमंत राष्ट्र अशी आपली ख्याती झाल्याचेही त्यांनी दाखवून दिले.
शिंदे-फडणवीसांना अमृत
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना असे काही अमृत मिळाले आहे, की आता त्यांची गाडी थांबणारच नाही. त्यांची गाडी वेगाने धावून महाराष्ट्राच्या विकासाची यात्राही निरंतर सुरूच राहील, असाही दावा गडकरी यांनी केला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88298 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..