
धान्य व्यापाऱ्यांचा जीएसटीविरोधात बंद
मुंबई, ता. १६ : केंद्राने अन्नधान्य व खाद्यपदार्थांवर लावलेला पाच टक्के जीएसटी रद्द करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरतर्फे आज राज्यात पुकारलेल्या व्यापार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, अॅग्रिकल्चर ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ही माहिती दिली. अन्नधान्यावरील जीएसटी रद्द न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल असेही ते म्हणाले.
कोल्हापूरमध्ये ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. राज्यभर १४ ते १७ जुलै या काळात लोकप्रतिनिधी, खासदार व आमदार यांना या विषयावर चेंबरच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी व जीएसटी आयुक्त यांना व्यापारी शिष्टमंडळांनी निवेदन देऊन अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीला सरकारने लवकर दाद न दिल्यास अन्य व्यापारीसुद्धा आंदोलनात उतरतील असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भातील पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी २४ जुलैला औरंगाबाद येथे राज्यातील व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महापरिषद आयोजित केल्याची माहिती गांधी यांनी दिली.
ग्राहक पंचायतीचे मोदींना पत्र
धान्य, डाळी आणि कडधान्ये ही ग्राहकांची जीवनावश्यक गरज असल्याने त्यावर जीएसटी आकारण्याला मुंबई ग्राहक पंचायतीने आक्षेप घेतला आहे. सतत सर्व गोष्टी महाग होत असताना आता डाळी, कडधान्यांवर पाच टक्के जीएसटी लावून नागरिकांचे जगणे आणखी कठीण करू नये आणि हा जीएसटी त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन मुंबई ग्राहक पंचायतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पाठवले. कल्याणकारी राष्ट्रात सरकारची आर्थिक भूक सर्वसामान्य ग्राहकांच्या अन्नाच्या भुकेपेक्षा मोठी होऊ शकत नाही, असेही पंचायतीने म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89251 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..