
शेअर भाड्यात पुन्हा दोन रुपयांची वाढ
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : कल्याण-डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी काही थांबायचे नाव घेत नाही. रिक्षाभाडे दरावरून आरटीओने वारंवार रिक्षाचालकांचे कान टोचले; मात्र रिक्षाचालकांनी शेअर भाडे दरात दोन रुपयांची वाढ करत प्रवाशांची लूट सुरू ठेवली आहे. गांधीनगर, गणेशनगर, पी अँड टी कॉलनी येथील शेअर दरात वाढ झाल्याचा फलक रिक्षा चालक मालक संघटनेने लावला आहे. आरटीओला कानोकान खबर लागू न देता रिक्षाचालक प्रवाशांवर भाडेवाढ लादत असून, आरटीओ अशी बघ्याची भूमिका किती दिवस घेणार, असा संतप्त सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत.
उप प्रादेशिक परिवहन विभागाने लागू केलेले शेअर रिक्षा भाडे रिक्षाचालकांना मान्य नसून, वाढीव भाडे मिळावे अशी त्यांची मागणी आहे. सध्या पावसाचे दिवस असून, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होऊन मेंटेनन्सचा खर्च वाढत आहे. खड्ड्यातील रस्त्यांवरून जायचे असल्यास रिक्षाचालक वाढीव भाडे आकारत आहेत. महिनाभरापूर्वीच डोंबिवली पूर्वेत रिपब्लिकन रिक्षा चालक-मालक युनियनने भाडेवाढ केली होती. त्यानंतर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील वाढीव दराचा फलक शहरात झळकावला होता; मात्र वेळीच कानउघाडणी करत आरटीओने ही दरवाढ रद्द केली होती, परंतु या कारवाईचा कोणताही धाक ना चालकांना आहे ना संघटनांच्या मालकांना.
आरटीओला कल्पनाच नाही
डोंबिवली पूर्वेतील गांधीनगर, गणेशनगर, पी अँड टी कॉलनी येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा संघटनेने शेअर भाडे दरात दोन रुपयांची वाढ केली असून, १३ रुपयांऐवजी १५ रुपये शेअर भाडे प्रवाशांकडून रिक्षाचालक आकारत आहेत. गेल्या दोनतीन दिवसांपासून ही वाढ करण्यात आली असून, वाहतूक विभागाला मात्र याची पुसटशीही कल्पना नाही. आरटीओला याविषयी विचारणा केली असता दरात कोणतीही वाढ झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
---
कोट
प्रवाशांनी तक्रार केली तरच आरटीओ प्रशासन जागे होते आणि कारवाईचा दिखावा करते. इतर वेळेस प्रवाशांना काय त्रास होतो किंवा नाही याची माहितीदेखील आरटीओला नसते. मीटरप्रमाणे भाडे आकारण्याचे निर्देश आरटीओने दिले होते. त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
प्रतीक जोशी, प्रवासी
कोट
आरटीओने काही तरी ठोस कृती करावी, जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडत चालला आहे. रिक्षाचालकांची मनमानी वाढत असून, एक दिवस सर्व परिस्थिती हाताबाहेर जाईल. वाहतूक पोलिसांचा धाक चालकांना राहिलेला नाही.
संकेत कांबळी, प्रवासी
कोट
शेअर रिक्षा भाडे दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. अशा पद्धतीने कोणी फलक लावला असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
उमेश गीत्ते, पोलिस निरीक्षक, वाहतूक उप विभाग, डोंबिवली
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89389 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..