
नवी मुंबई पालिकेकडून पाच लाख तिरंग्याचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २१ ः देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने राबवण्यात येत असणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिका शहरातील नागरिकांना तब्बल पाच लाख तिरंगा वाटप करणार आहे. सीएसआर निधीतून चार लाख तिरंगा उपलब्ध केले जाणार आहेत. उर्वरित तिरंगा महापालिका स्वतः खरेदी करणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम शहरात राबविला जाणार आहे. प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने आपल्या घरी तिरंगा फडकवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे. त्याकरिता महिला सामाजिक संस्था व बचत गटांचा प्रत्यक्ष सहभाग करून घेण्यात येणार आहे.
प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासोबतच सोसायटी, कार्यालय व संस्थांमध्ये तिरंगा फडकावयाचा आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वजाची गरज लागणार आहे. महापालिका प्रशासनातील काही विभाग प्रमुख आणि उपायुक्तांच्या खांद्यावर तिरंगा उपलब्ध करण्याची जबाबदारी दिली आहे. सीएसआरचा पर्याय ठेवण्यात आला आहे. ज्या नागरिकांना स्वतः तिरंगा खरेदी करून लावता येणार नाही, अशांना महापालिका विभाग कार्यालयामार्फत वाटप करण्यात येणार आहे. आपले राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याची ही एक नामी संधी असून या निमित्ताने संपूर्ण देशभरात एकाच वेळी तिरंगा फडकविला जाऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडणार आहे.
महिला बचत गटांमार्फत तिरंगा बनवण्याचे काम करण्यात येणार आहे. बचत गटांचे सहकार्य घेण्याचे ठरवले आहे. तब्बल ७२ हजार तिरंगा तयार करण्याचा महापालिकेचा मानस आहे. १२ बाय १८ आकारात खादी, स्पन, लोकर, सिल्क, पॉलिस्टर कापडाचे तिरंगा बनवायचे आहेत. या महिलांना महापालिकेतर्फे सीएसआरच्या माध्यमातून पैसे दिले जाणार आहेत.
- दादासाहेब चाबुकस्वार, उपआयुक्त, समाज विकास विभाग
विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यशाळा
‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आणि जनजागृतीसाठी महापालिकेने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यशाळेचे आयोजन केले होते. या वेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त जयदीप पवार, सहायक आयुक्त संजय तायडे, सहायक आयुक्त सुखदेव येडवे, समाजविकास अधिकारी सर्जेराव परांडे आदी उपस्थित होते. कार्यशाळेला ९६ बचत गटांच्या महिलांनी उपस्थिती लावली.
प्रचार, प्रसारात महिलांचे योगदान
हर घर तिरंगा उपक्रमामुळे बचत गटांना रोजगार उपलब्ध होईल, असे मत सुजाता ढोले यांनी व्यक्त केले. तर कोणत्याही कामात महिलांचा सहभाग असेल तर ते काम यशस्वी होते. या उपक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यात महिलांचे योगदान मोठे असेल असा विश्वास जयदीप पवार यांनी व्यक्त केला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89752 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..