
रस्त्यांची अवस्था बिकटच
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : राज्यात रस्त्यांची अवस्था बिकट आहे, म्हणूनच रेल्वेने प्रवास करायला प्राधान्य देतो. जर विकास हवा असेल तर एकदा मनसेला संधी देऊन बघा. नाशिकमध्ये सत्ता असताना तिथे जे रस्ते बनवले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.
महासंवाद दौऱ्याच्या निमित्ताने ते रविवारी ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी सीकेपी हॉल येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आम्ही लक्ष केंद्रीत केले असून, त्यांचे विषय घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत, असे ते यावेळी म्हणाले. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत ज्या पदाधिकाऱ्यांनी काम केले आहे, त्यांना नक्कीच संधी दिली जाईल, असेही ते म्हणाले.
...तर दौरे काढले असते का ?
मागील काही दिवसांत ज्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत, त्या घडल्या नसत्या तर त्यांनी हे दौरे काढले असते का, असा खोचक टोला अमित ठाकरे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना लगावला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यांनी जेवढे महाराष्ट्रात दौरे केले तेवढे इतर कुणी केले नसतील, असा दावा करत आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे जात असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90140 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..