
आरक्षण सोडतीवर भाजप, कॉंग्रेसचा आक्षेप
मुंबई, ता. २९ : ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर आज महापालिकेची नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली; मात्र या सोडतीवरही राजकीय पक्षांनी आक्षेप घेतले आहेत. ओबीसी आरक्षणाची सोडत प्रक्रिया चुकीची आहे, असा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. या आरक्षण प्रक्रियेवर हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली; उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही देण्यात आला. दुसरीकडे कॉंग्रेसही न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.
ओबीसींच्या आरक्षित जागा निश्चित करताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्राधान्यक्रमाची पद्धत अमलात आणली. सन २००७, २०१२ व २०१७ च्या निवडणुकीत जे प्रभाग कधीही ओबीसींसाठी आरक्षित नव्हते, असे प्रभाग प्राधान्यक्रम एकमध्ये निवडण्यात आले आहेत. अशा प्रकारचे ५३ प्रभाग जाहीर करण्यात आले; मात्र या प्रभागांमध्ये काही प्रभाग असे आहेत, जे गेल्या निवडणुकीत आरक्षित होते. तरीही यावेळी पुन्हा आरक्षित झाल्याचा आरोप कोटेचा यांनी केला आहे. मुंबई महापालिकेच्या प्रभागांची यंदा पुनर्रचना करण्यात आली आहे. २२७ प्रभागांमध्ये आणखी नवीन नऊ प्रभाग वाढल्याने प्रभागांची संख्या २३६ झाली आहे. त्यामुळे सर्वच प्रभागांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे मागील दोन-तीन निवडणुकांमधील आरक्षण गृहित धरण्यापेक्षा ओबीसी आरक्षणासाठी संपूर्ण सोडत काढावी, अशी मागणी कोटेचा यांनी केली आहे.
---
सलग २३ प्रभाग आरक्षित
मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६९ ते १९३ मध्ये आरक्षण निश्चित झाले आहे. सलग २३ प्रभागांमध्ये कसे काय आरक्षण निश्चित होऊ शकते, त्यामुळे मुंबईत इतर लोकांना न्याय मिळणार का, असा सवाल माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला. याबाबत आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया होत नसल्याची बाब मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90720 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..