
ऐतिहासिक महत्त्व असलेले अंबरनाथचे शिवमंदिर
अंबरनाथ, ता. ३१ (बातमीदार ) : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथचे शिवमंदिर भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणून ओळखले जाते. राजा शिलाहार मंडलेश्वर यांनी १०६० च्या दशकात शिवमंदिर बांधल्याचा शिलालेख भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेले हे शिवमंदिर केवळ अंबरनाथ शहराचेच नव्हे, तर देशाचे वैभव आहे. श्रद्धा असलेल्या भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे. तसेच ते स्थापत्य कलेच्या अभ्यासकांचे ऊर्जास्थान आहे. येथे श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहावयास मिळते.
शिवमंदिरात दर सोमवारी भक्तांची सकाळपासून रात्रीपर्यंत गर्दी असते. याशिवाय महाशिवरात्रीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात. दोन दिवस मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप असते. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत दर्शनासाठी मंदिर भाविकांना बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर यावर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
दररोज आणि श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने रोज सकाळी ८ वाजता अभिषेक केला जातो. त्यानंतर उपस्थितांच्या वतीने हर हर महादेव नावाचा जयघोष होतो. शिवमंदिराच्या प्रांगणात श्रावणमास हिंदू धर्म महोत्सव समितीच्या वतीने महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अखंड श्रावण महिना रोज दुपारी महाप्रसादाचे वाटप केले जाते. गेल्या २१ वर्षांपासून विजय पाटील, रवी पाटील, युवराज पाटील, रुद्रराज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने श्रावण मासानिमित्त महोत्सव आयोजित केला जातो. या काळात भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी ह.भ.प. विश्वनाथ महाराज वारिंगे, ओमी साई, बापूजी महाराज आणि बटुकजी महाराज यांची कीर्तने, प्रवचने होणार आहेत. अंबरनाथ आणि परिसरातील विविध क्षेत्रातील युवक आणि नागरिक स्वतःहून हिरिरीने सहभागी होऊन महिनाभर सेवाकार्य करतात, असे विजय पाटील यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90905 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..