
अवघ्या ३०० फेरीवाल्यांकडून कर्जाची परतफेड
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ ः फेरीवाला धोरणाअंतर्गत त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी केंद्राकडून कर्ज देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत ५ हजार २२६ फेरीवाल्यांना या कर्जाचे वाटप करण्यात आले. त्यापैकी अवघ्या ३०० फेरीवाल्यांनी या कर्जाची परतफेड केली असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येत आहे. त्यात २०२० मध्ये कोरोनाचा कहर वाढत असताना फेरीवाल्यांना त्यातून काही तरी आर्थिक सहाय्य मिळावे, या उद्देशाने या कर्जाचे वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार ७ हजार २१९ फेरीवाल्यांनी यासाठी अर्ज केले होते. त्यातील ५ हजार २२६ फेरीवाल्यांना १० हजार याप्रमाणे कर्जवाटप करण्यात आले. त्यातील ३०० च्या आसपास फेरीवाल्यांनी कर्जफेड केल्याने त्यातील २२५ फेरीवाल्यांना पुन्हा नव्याने २० हजारांचे कर्ज वितरित करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. दरम्यान तिसऱ्या टप्प्यात ५० हजारांचे कर्ज वितरित केले जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. दुसरीकडे १० हजाराप्रमाणे कर्ज घेतल्यानंतर ते एक वर्षाच्या आत परतफेड करणेदेखील अपेक्षित आहे. त्यानुसार आतापर्यंत ३०० च्या आसपास फेरीवाल्यांनी कर्जाची परतफेड केली असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91436 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..