
पर्यटनस्थळे सुंदर होण्यासाठी प्रयत्न करणार ः लोढा
मुंबई, ता. २७ ः राज्यातील पर्यटनाला गती मिळावी आणि राज्यातील पर्यटनस्थळे अधिक सुंदर व्हावीत, यावर आपण भर देणार आहोत, असे राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. जागतिक पर्यटनदिनाचे औचित्य साधून गेट वे ऑफ इंडिया परिसरात स्वच्छता अभियान पार पडले, त्या वेळी लोढा बोलत होते. गेटवे ऑफ इंडिया हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे हे पर्यटनस्थळ तसेच सर्वच पर्यटनस्थळे सुंदर ठेवणे सर्वांचेच कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
या मोहिमेत पर्यटनसंचालक मिलिंद बोरीकर, अमृता फडणवीस, सहायक संचालक धनंजय सावळकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त एस. के. गुरव सहभागी झाले होते. दिव्याज फाऊंडेशन, ब्राईट फ्युचर या संस्थांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला.
स्वच्छ शहर पारितोषिकासाठी प्रयत्न ः अमृता फडणवीस
जिथे स्वच्छता नांदते तिथे शक्ती असते. आपला भारत, महाराष्ट्र व मुंबई शहर स्वच्छ असावे, यासाठी असे स्वच्छतेचे उपक्रम राबविणे अत्यंत गरजेचे आहे. आगामी स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत मुंबई शहर असावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. अशा छोट्या उपक्रमातून स्वच्छ शहर करण्यासाठी प्रयत्न करूया, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.