
अधिक जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा!
अंबरनाथ, ता. १ (बातमीदार) ः आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून ४५ जागा आणि विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा जिंकून आणण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पक्षाच्या महिलांना केले.
कल्याण जिल्हा भाजपच्या वतीने आयोजित महिलांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.
प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, शहराध्यक्ष अभिजित करंजुले पाटील, रेखा चौधरी, शहर महिलाध्यक्षा सुजाता भोईर यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाच्या महिला प्रतिनिधी आणि पदाधिकारी या वेळी उपस्थित होत्या.
गेल्या आठ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि चार महिन्यांच्या कमी कालावधीत शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय, नागरी विकासाची कामे घरोघरी पोहोचवण्यासाठी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. पदे घेतलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी आपापसांतील मतभेद विसरून पक्षसंघटना वाढीबरोबरच पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. महिलांवर अन्याय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा संदेश सरकारने दिला आहे. महिलांवर अन्याय, अत्याचार झाल्यास ताबडतोब पोलिस ठाण्यात जा, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सतर्क राहा, असा सल्लाही त्यांनी दिला.
...
राज्यपालांबाबत संदेश पोहोचला!
शिवरायांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राज्यपालांवर कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारला नसून याबाबत योग्य ठिकाणी संदेश पोहोचल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.