
आंबेडकरी अनुयायांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी राज्य शासन, सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महापालिका, पोलिस यंत्रणा सज्ज आहे. डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांना सर्व मूलभूत सुविधा पुरवण्यात येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. अनुयायांनी शिस्तीत दर्शन घेऊन शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सुविधांचा पालकमंत्री केसरकर यांनी आढावा घेतला. या वेळी अपर पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव डिंगळे, बृहन्मुंबई महापालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, नागसेन कांबळे, चैत्यभूमी नियोजन समितीचे महासचिव रमेश जाधव उपस्थित होते.
केसरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या अनुयायांकरिता उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी करून आढावा घेतला. दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची तसेच बिस्किटांची सोय, आरोग्य सुविधा, उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी आच्छादन आणि कार्पेट टाकण्याची सूचना त्यांनी केली. फिरती स्वच्छतागृहे, थंडीपासून बचावासाठी ब्लँकेटची व्यवस्था आदींसाठीही त्यांनी सूचना केल्या. शिवाजी पार्क येथे अनुयायांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ५० हजार चौ.फूट जागेत वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले आहेत. येथे आलेल्या अनुयायांची केसरकर यांनी भेट घेऊन व्यवस्थेबाबत त्यांच्याशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. महापालिकेमार्फत पुरवल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसांत उर्वरित काम पूर्ण होईल. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चैत्यभूमी परिसरात सहा पोलिस उपायुक्तांसह सुमारे १५०० पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. अनुयायांच्या सोयीसाठी विविध संस्थांचे स्वयंसेवक देखील मदत करणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.