
नागपूर-हैदराबाद ‘वन्दे भारत’ सुरू करा!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : विदर्भातील चारही जिल्ह्यांचा हैदराबादशी जवळचा व्यापारी संबंध असल्याने नागपूर-हैदराबाद वन्दे भारत एक्स्प्रेस लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्राद्वारे केली आहे.
नागपूर हे मध्य भारतातील मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या प्रांतांना जवळचे सर्वांत मोठे शहर आहे. तसेच ते एक औद्योगिक शहरदेखील आहे; तर हैद्राबाद हे दक्षिणेकडील सर्वांत मोठे पर्यटन केंद्र आणि औद्योगिक शहर आहे. नागपूर ते हैदराबाद जोडणाऱ्या सध्या २२ रेल्वेगाड्या असल्या, तरी ५७५ किलोमीटरचे अंतर पार करणारी वेगवान गाडी असणे आवश्यक आहे. नागपूरसोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांनाही वन्दे भारत एक्स्प्रेसचा फायदा होईल, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे या भागात येणारे पर्यटक, व्यापारी आणि उद्योजक यांच्या सोयीकरिता नागपूर-हैदराबाद वन्दे भारत एक्स्प्रेस तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे मुनगंटीवार यांनी पत्रात म्हटले आहे.