
भूकंपमापक यंत्र बसवा !
किन्हवली, ता. १३ (बातमीदार) : वेहळोली गावाला सातत्याने बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे भूकंपमापक यंत्र व मोबाईल टॉवर बसविण्याची मागणी केली आहे.
शहापूर तालुक्यातील किन्हवलीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वेहळोली (खु) गावाला गेल्या २२ नोव्हेंबरपासून कमी अधिक तीव्रतेचे भूकंपाचे धक्के सातत्याने बसत आहेत. वेहळोली गावात मोबाईलला नेटवर्क नसल्याने ग्रामस्थांचा कोणाशीच संपर्क होत नाही. या ठिकाणी भूकंप मापक यंत्र बसवावे; तसेच नागरिकांचा संपर्क व्हावा म्हणून मोबाईलला नेटवर्कसाठी टॉवर मंजूर करावा, अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्या वैशाली सुनील निमसे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे केली आहे. याबाबतची मागणी यापूर्वी माजी आमदार पांडुरंग बरोरा, शहापूरचे आमदार दौलत दरोडा व मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनीही केली होती.