
खरवईतील पाण्याच्या टाकीला गळती
बदलापूर, ता. १३ (बातमीदार) : बदलापूर पूर्व खरवई नाका येथील पाण्याच्या टाकीला भेगा पडल्या असून या टाकीतून दररोज हजारो लिटर पाणी रोज वाया जात आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या ठिकाणी लक्ष देऊन लवकरात लवकर या टाकीची दुरुस्ती करण्याची मागणी येथील स्थानिक करत आहेत.
बदलापूर पूर्वेकडील खरवई नाका परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ८ लाख लिटर इतकी क्षमता असलेली पाण्याची टाकी आहे. या टाकीला जवळपास १२ वर्षे झाली आहेत. इतक्या लवकरच या टाकीला भेगा पडल्या असून या टाकीतून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या टाकीतून आजूबाजूच्या परिसरात पाणीपुरवठा केला जातो. आधीच लोकसंख्या वाढत असल्याच्या कारणास्तव उपलब्ध पाणीसाठा पुरवण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला अडचणी होत आहेत; तर दुसरीकडे या पाण्याच्या टाकीला लागलेल्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी रोज वाया जात आहे. टाकीला जोडलेल्या पाईपच्या चारही बाजूंनी पाण्याची धार कोसळत आहे. वेळीच लक्ष घालून ही पाण्याची टाकी दुरुस्त करण्याची मागणी येथील स्थानिक करत आहेत.
.................................
खरवई विभागातील पाण्याच्या टाकीला लागलेली गळती लवकर दुरुस्त व्हावी यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रयत्न करत आहे. कुशल तंत्रज्ञान असलेल्या कंपनीकडून लवकरच हे काम करून देणार आहे.
- माधुरी पाटील, उपअभियंता, मजीप्रा