
उल्हासनगरात महिलांचे आंदोलन
उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : राज्य सरकारने प्लास्टिकबंदी शिथिल करण्याचा घेतलेला निर्णय हिवाळी अधिवेशनात मागे घ्यावा, या मागणीसाठी उल्हासनगरातील एकवटलेल्या महिलांनी आंदोलन करून सरकारला हाक दिली आहे. प्लास्टिकबंदी शिथिल करण्यात आल्याने पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे कागदी पिशव्या बनवून मोठे योगदान देणाऱ्या महिलांच्या हाताला काम मिळणे मुश्किल होणार असल्याने हिवाळी अधिवेशनात प्लास्टिकबंदी शिथिल करण्याचा घेण्यात आलेला निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी उल्हासनगरातील महिला एकवटवल्या आहेत.
उपविभागीय कार्यालयाच्या आवारात कागदी पिशव्या तयार करणाऱ्या असंख्य महिलांनी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ज्योती तायडे आणि सचिव रामेश्वर शेरे यांच्या नेतृत्वाखाली प्लास्टिक हटाव, कागदी बचाव असे आंदोलन करून राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा मागे घेतलेला निर्णय हिवाळी अधिवेशनात शिथिल करावा, अशी हाक दिली आहे. आंदोलनापूर्वी ज्योती तायडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार कुमार आयलानी, उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांना निवेदन देण्यात आले होते.