
आयटीआय आधुनिकीकरणासाठी बाराशे कोटी
नागपूर, ता. २७ : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांचे विद्यावेतन ४० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात येईल. तसेच या आयटीआयच्या नूतनीकरणासाठी बाराशे कोटींचा प्रस्ताव आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान परिषदेत सोमवारी दिली.
विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आहे. तीन महिन्यांत त्याला मंजुरी घेऊन अंमलबजावणी करू असेही ते म्हणाले. या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १९८२ पासून वाढ झाली नाही, असेही त्यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
आयटीआयमध्ये आधुनिक सुविधा
राज्यात ४१९ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) असून यातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आयटीआयचे नूतनीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी १,२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून आभासी वर्ग (व्हर्च्युअल क्लास रूम), ग्रंथालय, जीम अशा विविध सुविधा देण्यात येईल. येत्या सहा महिन्यांत याबाबत अंमलबजावणी होईल, असेही मंत्री लोढा यांनी उपप्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.