आयुक्तालयासाठी आजपासून थेट पोलिस भरती

आयुक्तालयासाठी आजपासून थेट पोलिस भरती

भाईंदर, ता. १ (बातमीदार) : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयात शिपाई आणि चालक या पदांसाठी सोमवारपासून (२ जानेवारी) थेट भरती प्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रक्रिया आगामी दोन महिने सुरू राहणार असून या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया जलद व पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. तसेच भरतीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेवर कॅमेऱ्‍याची बारीक नजर असणार आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच थेट भरती होत आहे. यात एकंदर ९९६ पोलिस शिपाई आणि १० चालक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या पदांसाठी सुमारे ७१ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान याठिकाणी सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू होणार असून ती २८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. ही भरती प्रक्रिया पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने होणार आहे. यासाठी येणाऱ्‍या प्रत्येक उमेदवाराला संगणकीय चीप लावण्यात येणार असून या प्रत्येक उमेदवाराची नोंद संगणकात होणार आहे. हैदराबादच्या ‘ई-सॉफ्ट’ या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. यात प्राप्त झालेल्या ७१ हजार ९५१ अर्जांमध्ये ५९ हजार ८४७ पुरुष व १२ हजार १०४ महिला उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात केवळ पुरुष उमेदवारांची निवड चाचणी होणार असून त्यानंतर महिला उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
.....
अशी होणार भरती
सकाळी साडेपाच वाजता उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यात प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रीक हजेरी घेतली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक उमेदवाराला चेस्ट क्रमांक दिला जाईल, त्यात संगणकीय चीप बसविण्यात आलेली असणार आहे. सर्वप्रथम उमेदवाराची उंची व छाती मोजली जाणार आहे. ही मोजणी देखील बसविण्यात आलेल्या सेन्सरद्वारे नोंदली जाणार आहे. या मोजणीत पात्र उमेदवारालाच पुढील चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यात पुरुष उमेदवाराला १६०० मीटर व १०० मीटर धावणे व गोळाफेक तसेच महिला उमेदवारांना ८०० मीटर व १०० मीटर धावणे व गोळाफेक या चाचण्यांचा समावेश आहे. या चाचण्यांची उमेदवाराकडे असलेल्या चीपच्या माध्यमातून संगणकात नोंद केली जाणार आहे. चीपमुळे वेळेची अतिशय अचूक अशी नोंद होणार आहे.
.....
कॅमेऱ्‍यांची असणार नजर
संपूर्ण भरती प्रक्रियेवर पन्नास कॅमेऱ्‍यांची बारीक नजर असणार आहे. यात तीन पद्धतीचे कॅमेरे असणार आहेत. पहिले म्हणजे जागोजागी पोलिसांचे सीसी टीव्ही असणार आहेत. दुसरे म्हणजे भरती प्रक्रिया पार पाडणाऱ्‍या कंपनीचे कॅमेरे असणार आहेत. याशिवाय जागोजागी हँडीकॅमद्वारेही चित्रीकरण करण्यात येणार आहे.
.....
कडक सुरक्षा व्यवस्था
भरती प्रक्रियेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली, मुख्यालय उपायुक्त, तीन सहाय्यक आयुक्त, २१ पोलिस निरीक्षक, ३६ सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक आणि २३१ पोलिस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
...
गेल्या दोन-तीन वर्षांत पोलिस भरती झाली नव्हती. त्यामुळे या भरतीमध्ये मोठ्या संख्येने उमेदवार येणार असल्यामुळे ही प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया जलद, अचूक व पारदर्शक होणार असून त्यात वेळ आणि श्रम कमी होणार आहेत. तसेच भरतीसाठी कोणीही पैशांची मागणी करत असेल तर उमेदवारांनी तातडीने त्याची माहिती पोलिसांना द्यावी.
- प्रकाश गायकवाड, उपायुक्त, मुख्यालय, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com