
धारखिंड, बांडेशीतवासियांची फरपट थांबणार
मुरबाड, ता. १० (बातमीदार) : माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मुरबाड तालुक्यातील मेर्दी ग्रामपंचायतीच्या हद्दीत धारखिंड व बांडेशीत परिसरातील ग्रामस्थांची तहान वर्षानुवर्षे विहिरीवर भागत होती. लोकसंख्या वाढल्यानंतर विहिरीतील पाणी कमी पडू लागले. उन्हाळ्यात पाण्यासाठी धावपळ करावी लागत होती. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या प्रयत्नांमुळे या गावाला आता नळाद्वारे पाणी उपलब्ध होणार आहे.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेत धारखिंड व बांडशित गावाचा समावेशाबाबत उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी प्रयत्न केले. त्यानंतर या योजनेला मंजुरी मिळाली आहे. उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात ग्रामस्थांसाठी हा दिवस सुवर्णदिन ठरला.
कार्यक्रमासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख कांतिलाल कंटे, रामभाऊ दळवी, भगवान भला, संजय पवार, पंचायत समितीच्या सदस्या अरुणा खाकर, प्रकाश पवार, मंगल निमसे, किसन आलम, अशोक पठारे, मेर्दीचे सरपंच पांडुरंग दरवडा, कालंभाडच्या सरपंच अनुसया वाघ, माळचे सरपंच नरेश खोडका, रघुनाथ खाकर आदींची उपस्थिती होती.