सेतू सहकाराचा

सेतू सहकाराचा

शरद्चंद्र देसाई
वकील, सहकार न्यायालय

पती निधनानंतर त्याच्या आईचे ना हरकत पत्र जरुरी आहे का?

प्रश्न ः माझी सदनिका माझ्या पतीसोबत आहे व भाग दाखलादेखील तसाच दिला आहे. माझ्या पतीचे निधन झाले, पतीने माझ्या नावे नामनिर्देशन केले आहे. माझ्या पतीला त्याची आई व इतर भावंडे आहेत. आता पतीची आई व इतर भावंडे यांच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी संस्था अडून बसली आहे. याबाबत कायद्यातील तरतूद काय आहे?
- नीलम महाराणे, मुंबई

उत्तर ः आपण संस्थेच्या कागदपत्रांच्या आणि कायद्यामधील तरतुदींच्या आधारे नामनिर्देशित व्यक्ती आहात. आपण मृत सभासदाच्या पत्नी आहात, तसेच सदनिका आपले पती तसेच आपल्या नावे संयुक्तरीत्या आहे. त्यामुळे तुमच्या सदनिकेकरता आपण संस्थेचे संयुक्त सभासद आहात. आपल्या पतीचे निधन झाले असल्याने त्यांचे सभासदत्व महाराष्ट्र सहकारी कायद्याच्या कलम २५ (२५) नुसार संपुष्टात आले आहे. त्यामुळे तुमच्या पतीचे नाव संस्थेच्या दप्तरातून, तसेच भाग दाखल्यामधून काढून टाकणे आवश्यक आहे. मृत व्यक्तीचे नाव सभासद दप्तरातून काढण्यासाठी कायदा कलम २५ ए हे वापरण्यात यावे. तुमच्या पतीचे नाव भाग दाखल्यावरून काढल्यानंतर त्यात केवळ तुमचेच नावदेखील ठेवता येईल, म्हणजे आपण संस्थेमध्ये आपल्या सदनिकेकरता सभासद म्हणून सर्व अधिकार बजावू शकता. याव्यतिरिक्त संस्थेने नामनिर्देशनाद्वारेदेखील तुमच्या पतीच्या ठिकाणी तुम्हाला नामनिर्देशित व्यक्ती म्हणून मान्यता द्यावी, तसेच सदस्य म्हणून स्वीकारावे, ही आपली विनंतीही योग्य व कायदेशीर आहे. म्हणून संस्थेने विनाविलंब तसेच इतर कोणतीही कागदपत्रे आणि आपल्या पतीची आई व इतर भावंडांचे ना हरकत पत्र न मागता ती विनंती मान्य करणे आवश्यक आहे. संस्थेची मागणी अयोग्य असून ती कायद्यानुसार नाही. संस्थेचा भाग दाखला तुमच्या नावे झाल्याने तुमच्या पतीचे इतर हक्क जर त्यांच्या आई व इतर भावंडांना मिळत असतील तर त्यासाठी त्यांनी दिवाणी न्यायालयामधून तसे आदेश मिळवणे आवश्यक आहे. सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये आपण मृत सभासदाच्या पत्नी असल्याने तुमचे हक्क देखील विचारात घेतले जाणार आहेत.

प्रश्न ः आमच्या सहकारी संस्थेमध्ये निवडणुका सुरू आहेत, संस्थेतील एकूण सभासद संख्या ९५ आहे. समितीमध्ये आवश्यक किती जागा निवडणुकीने भरणे आवश्यक आहे? ते कृपया सांगावे. कारण आमच्या संस्थेचे सभासद निवडणुकीसाठी फारच उदासीन आहेत. यासंदर्भात कृपया कायद्याची माहिती द्यावी.
- शलाका महादेव राणे, नवी मुंबई

उत्तर ः आदर्श उपविधी क्रमांक ११४ प्रमाणे तुमच्या संस्थेसाठी एकूण ११ सभासदांची व्यवस्थापन समिती आवश्यक आहे. यापैकी सहा सदस्य सर्वसाधारण गटातून, दोन महिला तसेच इतर मागासवर्ग, विशिष्ट जाती जमाती आणि विमुक्त भटक्या जमाती यांचा प्रत्येकी एक असे एकूण अकरा सभासद आवश्यक आहेत. त्यानंतर सभा घेण्यासाठी समितीची गणसंख्या सहा असेल.
सर्वसाधारणपणे असे निदर्शनास येते की, ज्या विशिष्ट (आरक्षित) जागा आहेत त्या, म्हणजे मागासवर्गीय गटातील जागा रिक्त राहतात. त्यामुळे महिला व सर्वसाधारण गट मिळून आठ जागा भरल्या जातात व समिती आठ सदस्यांची होते. अशा आठ सदस्यांच्या समितीची गणसंख्या पाच राहील. त्यामुळे आपण असा प्रयत्न निश्चितपणे करावा, जेणेकरून किमान आठ जागांकरता उमेदवार मिळतील व त्या निवडणुकीने भरल्या जातील असे पाहावे. अन्यथा सहकार निबंधक कार्यालयाकडून प्रशासकीय अधिकारी नियुक्त होऊन संस्था त्यांच्या ताब्यात जाण्याचा धोका आहे.

सहकारी संस्था, सहकार कायदा याबाबतचे आपले प्रश्न पुढील ई-मेलवर पाठवावेत - Sharadchandra.desai@yahoo.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com