वनसंपत्ती बहरणार

वनसंपत्ती बहरणार

प्रसाद जोशी, वसई
पालघर जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम अशा ग्रामीण भागात शेतकरी भातशेतीवर अधिक अवलंबून आहेत. मात्र याला पर्याय म्हणून जिल्हा परिषदेने १० लाख फळझाडे लावण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे फळधारणा झाल्यावर यातून शेतकऱ्यांना व्यवसायाचे नवे साधन प्राप्त होणार असून हा उपक्रम त्यांना फायदेशीर ठरणार आहे.
आदिवासीबहुल भाग पालघर जिल्ह्यात अधिक आहे. शेती करून येथील नागरिक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. अशातच काहीजण जोड व्यवसायाकडे वळू लागले आहेत. त्यातच पालघर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत नवी योजना आणली आहे. यात बहुतांश शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार असून व्यवसायाचा नवा मार्ग उपलब्ध होईल. यानुसार लाभार्थ्यांना फळझाडांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे झाडांना फळधारणा झाल्यावर त्याच्या विक्रीतून या शेकऱ्यांना उत्पन्न मिळणार आहे. पालघर, मोखाडा, वाडा, जव्हार, तलासरी, वसई, डहाणू, विक्रमगड भागात मोठ्या प्रमाणात शेतीजमीन आहे. याठिकाणी विविध पिकांसह, भातशेतीची लागवड केली जाते. मात्र यात हव्या त्या प्रमाणात उत्पन्न मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे पर्यावरण संरक्षण व व्यवसायाला चालना मिळावी म्हणून रोजगार हमी योजना विभाग व टाटा मोटर्स यांच्या सहकार्याने फलोत्पादन केले जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी सकारात्मक पावले उचलली आहेत. याबाबत टाटा मोटर्ससोबत करारदेखील करण्यात आला आहे. प्रत्येक तालुकानिहाय शेतकऱ्यांची यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर वर्गवारी करून शेतकऱ्यांना फळरोपांचे वाटप केले जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या योजनेनुसार या फळझाडांच्या लागवडीसाठी येणारा खर्च देण्यात येणार आहे. तसेच झाडांची उत्तम देखभाल, फवारणी, खत व झाडांची निगा कशी राखावी याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून आढावा घेऊन व्यवसायासाठी मदत करता येईल का, या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. या फळझाडांमध्ये चिकू, आंबा, फणस, काजू यासह अन्य फळरोपे देण्यात येणार आहेत.
--------------------
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा लाख फळरोपांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा मोटर्ससोबत करार करण्यात आला आहे. फळधारणा झाल्यावर त्यातून लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. यासंदर्भात कृषी विभागासोबत बैठक घेतली असून प्रत्येक लाभार्थ्याला दोनशे फळरोपे देण्यात येणार आहेत.
- भानुदास पालवे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
---
एकूण फळरोपांची संख्या - १० लाख
एकूण लाभार्थी - ५०००
एका शेतकऱ्याला - २०० फळझाडे वाटप
काजू, फणस, आंबा, चिकू जातीच्या झाडांचा समावेश
तालुकानिहाय लाभार्थ्यांची वर्गवारी
------------------------
कशी आहे योजना
फळरोपांचे वाटप केल्यावर रोप लावताना मजुरी स्वरूपात पैसे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. त्यामुळे खर्च वाचेल, त्यानंतर निगा राखण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला दिली जाणारी झाडे त्यांच्या जमिनीत लागवड करण्यासाठी जागेची पाहणी केली जाईल. तसेच कृषी विभागाकडून योग्य त्या सूचना दिल्या जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com