
उल्हासनगरात चार बांग्लादेशी नागरिकांना अटक
उल्हासनगर, ता. २१ (वार्ताहर) : मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाने उल्हासनगरात मारलेल्या छाप्यात ४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅम्प नंबर-४ मधील कृष्णानगर परिसरात काही बांगलादेशी अनधिकृतरित्या वास्तव्य करत असून त्यांच्याकडे कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्याची माहिती मुंबई दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कृष्णानगर परिसरात छापा टाकत चार बांगलादेशींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे खलील मंडल, लिटन शेख, नाचिमा खातून मंडल, शुकरअली शेख असून त्याच्यापैकी एका आरोपीकडे बांगलादेशची कागदपत्रे सापडली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक धनंजय कापरे करत आहेत.