
पोलिस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
जव्हार, ता. ३१ (बातमीदार) ः पोलिस उपनिरीक्षक प्रकाश काशीराम थेतले (वय ३८) यांनी मुंबईतील चुनाभट्टी येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २९ जानेवारीला रात्री घडली.
गरिबीवर मात करत ते या पदावर पोहचले होते. जव्हार तालुक्यातील विनवळ गावातील गरीब कुटुंबातून ते आले होते. आत्महत्येचे कारण कळलेले नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पत्नी व कुटुंबीयांनी केली आहे. याप्रकरणी प्राथमिक अहवालानुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. प्रकाश थेतले हे मुंबईतील चुनाभट्टी भागात राहत होते. त्यांना गेल्या काही महिन्यांपासून पगार मिळत नव्हता. ते मुंबईतील कोपरखैरणे पोलिस ठाण्यात कार्यरत होते. ते आजारी होते; मात्र उपचार घेत कार्यरत होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी कुटुंबीयांना काळजी घ्या (टेक केअर) असा मेसेज पाठवला होता. त्यांच्या गावी विनवळ येथे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गरिबीतून पुढे आलेला हा तरुण आदिवासी समाजाचा अभिमान होता.
दरम्यान, आदिवासी गरीब समाजातील मुलगा जिद्द, मेहनत, चिकाटी याच्या जोरावर पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत झाला होता. मात्र त्यांनी अचानक आत्महत्या का केली? या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे, जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी म्हटले आहे.