माथाडी कामगारांचा एल्गार

माथाडी कामगारांचा एल्गार

तुर्भे, ता. १ (बातमीदार) : माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकारचे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आक्रमक झालेल्या माथाडी कामगारांच्या संघटनांनी बुधवारी (ता. १) एकदिवसीय संप पुकारला होता. या आंदोलनात नवी मुंबईतील पाचही मार्केटसह नाशिक, कोल्हापूर, रायगड, मुंबईमधील विविध संघटनादेखील सहभागी झाल्याने बंद शंभर टक्के यशस्वी झाला. यावेळी २७ फेब्रुवारीला होणाऱ्या अधिवेशनापूर्वी राज्य सरकारने माथाडी कामगारांना न्याय दिला नाही तर तीव्र संघर्षाचा इशारा देण्यात आला.
राज्यात ३६ माथाडी मंडळे आहेत. त्या बृहन्मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्याकरिता एकूण ११ माथाडी मंडळे असून, या व अन्य मंडळांच्या पुनर्रचना अजूनही झालेल्या नाहीत. त्यामुळे माथाडी कामगारांशी निगडित विविध धोरणात्मक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे माथाडी कामगारांमध्ये राज्य सरकारविरोधात असंतोषाचे वातावरण आहे. यामुळे माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष्य वेधण्यासाठी एक दिवसीय संप करण्यात आला. या आंदोलनात बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील विविध उद्योगांतील, व्यवसायातील माथाडी कामगारांबरोबर नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, लातूर आदी विभागांतील माथाडी कामगार सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी राज्यातील सत्तेत बदल झाला असला तरी माथाडी कामगारांच्या मागण्यांकडे मात्र दुर्लक्षच होत असल्याची खंत व्यक्त केली. तसेच सहा महिन्यांपासून विविध प्रलंबित मागण्यांबाबतची अनेक निवेदने, आंदोलने करूनही सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेचे कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला. यावेळी आंदोलनात माथाडी कामगार युनियनचे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, बापूसाहेब भुजबळ, चंद्रकांत ढोले, मोहनभाई गुरनानी, शरद माऊ, अमृतलाल जैन कैलास ताजणे, राजीव मनीवार यांच्यासह पाचही बाजार समितीतील व्यापारी वर्ग सहभागी झाले होते.
---------------------------
राज्यभरातून आंदोलनाला पाठिंबा
माथाडी कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या लाक्षणिक संपात बॉम्बे गुडस ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, नवी मुंबईतील बाजार समितीच्या आवारातील व्यापारी असोसिएशन, किरकोळ व्यापारी असोसिएशन, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज्यात संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा माथाडी नेत्यांनी केला. यावेळी आंदोलनामुळे एपीएमसीतील पाच मार्केटमध्ये शुकशुकाट पसरला होता.
----------------------------
अण्णासाहेबांचे माथाडी कामगार आणि त्यांची कामगार संघटना माझा प्राण आहे. जर माथाडी कामगारांना न्याय मिळत नसेल तर मी गप्प बसणार नाही. सरकार कोणाचेही असो, जोपर्यंत माथाडी कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.
- नरेंद्र पाटील, माथाडी नेते
-------------------------------
नवीन वर्षाची सुरुवात एका लढ्यातून होत असून माथाडी कामगार ही आमची ताकद आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी माथाडी कामगारांवर आघात होईल, त्या त्या वेळी कामगारांसाठी रस्त्यावर उतरू.
- शशिकांत शिंदे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com