
कृषी विभागाच्या शिबिराचा २०० शेतकऱ्यांना लाभ
अंबरनाथ, ता. १४ (बातमीदार) : पंतप्रधान सन्मान निधीसाठी खाते आधार कार्ड लिंक करण्यासाठी कृषी विभागाने आयोजित केलेल्या शिबिराचा सुमारे २०० शेतकऱ्यांना लाभ झाला.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात. आतापर्यंत १२ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. १३ वा हप्ता खात्यात जमा करण्यापूर्वी खाते आधार कार्ड लिंक नसलेल्या शेतकऱ्यांचे पोस्ट कार्यालयात नवीन खाते उघडून देण्याच्या सूचना सरकारतर्फे देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उल्हासनगर तालुका कृषी विभागाने बदलापूर पोस्ट कार्यालयाच्या सहकार्याने अंबरनाथ तालुक्यातील रहाटोली ग्रामपंचायत हॉलमध्ये मंगळवारी खाते उघडून ते लिंक करण्यासाठी शिबिर भरवले होते.
अर्ज करूनही शेतकऱ्यांना सन्मान निधीचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी येत असतात. योजनेसाठी पात्र असूनही बँक खाते आधार कार्डाशी लिंक नसलेल्या शेतकऱ्यांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तालुका कृषी अधिकारी विठ्ठल बांबळे, मंडळ कृषी अधिकारी सुवर्णा माळी, अविनाश वडते, सचिन तोरवे, अनिता नेहे, कोमल लोंढे आणि पोस्ट खात्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. रहाटोली, सांगाव, कारंद, मुळगाव, पाचोन, आंबेशिव, इंदगाव, शिळ परिसरातील सुमारे २०० शेतकऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला.