
उल्हासनगरात अनधिकृत रिक्षांच्या धरपकडीची मोहीम
उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : परवाना बाद झालेल्या किंवा त्याचे नूतनीकरण करण्यात आले नसणाऱ्या अनधिकृत रिक्षांची धरपकड करण्याची मोहीम उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांची एकच धावपळ सुरू झाली आहे. या मोहिमेअंतर्गत ७ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या हद्दीत उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि शहाड ही तीन रेल्वे स्थानक असून येथे अनधिकृत रिक्षाचालकांच्या उच्छादामुळे वाहतूक कोंडी होत आहे. अशीच परिस्थिती कल्याण-बदलापूर महामार्गावरही निर्माण झाली होती. या रिक्षात चोरीच्या व आरटीओच्या नियमाप्रमाणे कालबाह्य झालेल्या रिक्षा वापरात असल्याचयी तक्रारी वाढल्या होत्या. त्याअनुषंगाने पालिका आयुक्त अजीज शेख यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अधिकारी सहायक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी, तुषार सोनवणे, दत्तात्रय जाधव, वाहतूक पोलिस निरीक्षक अमित नलावडे व वाहतूक पोलिस अधिकारी यांनी मंगळवारी अनधिकृत रिक्षांची धरपकड करण्याची मोहीम राबवली. यामध्ये ७ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. मात्र वाहतूक विभागाचे वाहन बघताच रिक्षाचालकांनी पळापळ केली आहे. यावेळी अश्या कारवाईची मोहीम टप्याटप्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याची महिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.