
कोपरखैरणेतील हत्या प्रकरणाचा उलगडा
नवी मुंबई (वार्ताहर)ः कोपरखैरणेतील खाडी किनारी महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला यश आले आहे. या घटनेतील मृत महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या सुरक्षा रक्षकाने ही हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
कोपरखैरणेतील ‘कांचनगंगा’ सोसायटीच्या विरुद्ध बाजूला असलेल्या खाडीतील झुडपांमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेची ओढणीने गळा आवळून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांसोबत गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाकडून देखील समांतर तपास करण्यात येत होता. गुन्हे शाखेने मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांत मिसिंग झालेल्या महिलांबाबतची माहिती घेतली असता, ट्रॉम्बे पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सायदा बानू हासमी (३३) या महिलेचा तो मृतदेह असल्याचे आढळून आले होते. या महिलेने सुरक्षा रक्षक असलेल्या राजकुमारच्या पाठीमागे लग्नासाठी तगादा लावल्याने तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त अमित काळे यांनी दिली आहे.