
एमएमआरक्षेत्राचा विकास करणार : मुख्यमंत्री
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : केंद्र व राज्य मिळून डबल इंजिनचे सरकार आले आहे. त्याची ताकद काय आहे, ही आता या राज्याला कळली आहे. डबल इंजिनचे हे सरकार वेगाने धावतेय म्हणून आपल्याला विकास दिसत आहे. यापुढेही विकास दिसेल. मुंबईसह एमएमआर क्षेत्रामधील ठाणे, कल्याण डोंबिवलीसह सर्व महापालिकांचे डब्बे जोडले जातील आणि ही विकासाची एक्स्प्रेस आणखी तुफान वेगाने धावेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण येथे व्यक्त केला.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विविध उपक्रमांचे लोकार्पण बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, विश्वनाथ भोईर, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातील शेनाळे तलावाचे प्रबोधनकार ठाकरे सरोवर नामकरण, मलनिःसारण केंद्राचे उद्घाटन, बीएसयूपी घरांच्या चावीचे वाटप मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
मख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, केंद्र व राज्य सरकार हे एका विचाराचे सरकार आहे. राज्याच्या विकासासाठी केंद्राकडे जे काही मागितले ते ते दिले गेले आहे. त्यामुळे हा विकासदेखील आपल्याला दिसत आहे. खड्डेमुक्त मुंबई याच धर्तीवर खड्डेमुक्त एमएमआर रिजन होईल. या भागातही चांगले रस्ते होतील. या ठिकाणी रस्त्यांसाठी जो काही निधी लागेल तोदेखील देईल; परंतु माझे ठाणे जिल्ह्यात येणे कमी झाले, तर तुम्ही मला समजून घ्याल, असे भावनिक आवाहन त्यांनी उपस्थित सर्वांना केले.
कल्याण पश्चिमेलादेखील निधी येऊ द्या....
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी करताना सांगितले, ठाणे जिल्ह्याचा मास्टर प्लॅन करा आणि आमच्या एमएमआर रिजनमध्ये ती कामे लवकरात कवकर करा, जेणेकरून नागरिकांचा प्रवास सुखकर होईल. कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी आणखी निधीची आवश्यकता आहे, असे खासदार शिंदे म्हणताच, कल्याण पश्चिमेलादेखील निधी येऊ द्या, अशी मागणी मंत्री कपिल पाटील यांनी केली. यावर खासदार शिंदे यांनी तुमच्या ही भागाला निधी मिळाला पाहिजे. कल्याण पश्चिमेत अनेक चांगले रस्ते व स्मार्ट सिटीची कामे होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.