शेतकऱ्यांचे ‘सोने’धुळखात

शेतकऱ्यांचे ‘सोने’धुळखात

सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. १६ ः राज्य सरकारने दिलेल्या मुदतीच्या आधी भातखरेदी करून सुद्धा पनवेल सहकारी भात खरेदी केंद्रावर गेल्या महिनाभरापासून पाच हजार क्विंटल भात धुळखात पडला आहे. हा भात उचलण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडून ठेकेदार गिरण्यांची नियुक्ती झाली नसल्याने खरेदी केलेला भात उघड्यावरच पडून सडण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
रायगड जिल्ह्यात खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामांमध्ये शेती होते. त्यापैकी खरिपात केलेल्या शेतीमधील भाताची खरेदी ३१ जानेवारीपर्यंतच करावी, अशी सरकारने अट घातली होती. मात्र या कालावधीत अपेक्षित खरेदी झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देत १५ फेब्रुवारीपर्यंत खरेदी करण्यात आली. सध्या पनवेलच्या सहकारी भात खरेदी केंद्रावर तब्बल पाच हजार क्विंटल भात पडून आहे. जानेवारी महिन्याच्या १५ तारखेपासून आत्तापर्यंत भाताच्या गोण्या उन्हात उघड्यावर पडल्या आहेत. हे धान्य उचलण्यासाठी जिल्हा परिषदेने अद्याप गिरणी ठेकेदारांची नियुक्ती केली नसल्याचे समजते आहे. त्यामुळे धान्य उघड्यावर पडून राहिले आहे. पनवेल सहकारी भात खरेदी केंद्राच्या मालकीचे गोदामात अर्धा माल आणि निम्मा भाताच्या गोण्या गोदामाबाहेर पडल्या असल्याने रात्री आणि पहाटे वातावरणात दाट धुके पसरत असल्यामुळे हा भात सडण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
----------------------------------
पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांकडून आत्तापर्यंत दोन्ही हंगामात तब्बल ३१ हजार ४०० क्विंटल भात खरेदी केले आहे. सरकारकडून नियुक्त केलेल्या जळगाव महाकर माथा, सिंधुदुर्ग बजाज राईस आणि सांगली ज्योतीर्लिंग एन्टरप्रायजेस , अलिबाग श्री स्वामी समर्थ राईसमील अशा चार ठेकेदारांनी पनवेल तालुका सहकारी भात गिरण खरेदी केंद्रातून भात उचलला आहे.  मात्र, १५ जानेवारीपासून धान्य उचलण्यासाठी आवश्यक ठेकेदारांची नियुक्ती रायगड जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेली नाही. त्यासाठी पनवेल सहकारी भात खरेदी केंद्राकडून तीन वेळा पत्र देण्यात आले आहे. मात्र, कोणतीही हालचाल झालेली नाही.
------------------------------
जिल्हा पुरवठा अधिकारी पद रिक्त
रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून मधुकर बोडके हे कामकाज पाहत होते. चार महिन्यांपूर्वीच त्यांची मंत्रालयात बदली झाली. तेव्हापासून आजपर्यंत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बयनाडे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
-------------------------------
खरेदीसाठी दोनदा मुदतवाढ
पनवेल तालुक्यातील १,१५० शेतकऱ्यांनी भात विकला आहे. उरणला ४६५ शेतकऱ्यांनी भात विकला आहे.  सुरुवातीला ३१ जानेवारीपर्यंतची मुदत होती. ती वाढवून १५ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांकडे असणारा शिल्लक धान्यसाठा पाहता आता ही मुदतही २८ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे.
-----------------------------------------
शासनाकडून परिपत्रक आल्यानंतर भर्डाई करण्यासाठी ठेकेदार नेमण्याची प्रक्रीया सुरु होते. त्यानुसार प्रक्रीया पूर्ण करून धान्य भर्डाई करण्यासाठी संबंधितांना नवीन नियुक्ती पत्र देण्यात आले आहेत. लवकरच भात खरेदी केंद्रावरच धान्य उचलण्याची प्रक्रीया सुरु होईल.
-गोविंद वाकडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com